माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर वावेदिवाळी गावच्या हद्दीत शनिवारी (ता. २८) दुपारच्या सुमारास भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी माणगाव पोलिसांत नोंद झाली असून, कारचालकाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम अनंता धारदेवकर (वय ६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कार महाडच्या दिशेने चालली होती, तर धारदेवकर हे कोलाडवरून माणगावच्या दिशेने चालले होते. या वेळी या कारने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यांच्या डोक्याला आणि कंबरेला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कारचालक मद्यधुंद असल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी केला आहे. तसेच ‘भारत सरकार’ अशी पाटी असलेल्या या कारमध्ये अधिकारी होते.अपघात होताच ते सर्व जण पळून गेल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.