मुंबई : सरणारे २०२४ हे वर्ष अनपेक्षित राहिलं, हे वर्ष जागतिक पातळीवर राजकीय अस्थिरतेचं राहिलं. युक्रेन, गाझा पट्टी, सुदानमध्ये लष्करी संघर्ष दिसून आला. पश्चिम आशिया, आफ्रिका, दक्षिण कोरिया आणि बांगलादेशमधील जनआंदोलनामुळे जगभरात तणावाची स्थिती होती.
दरम्यान रतन टाटा यांचं निधन आपल्या सर्वांसाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी मोठी हानी होती. ते दूरदर्शी व्यक्ती होते, त्यांनी एका पिढीच्या व्यवसायाला आकार दिला. असे असले तरी आगामी पाच वर्षात पाच लाख रोजगारांची निर्मिती करण्याबाबत विचार करत असल्याचं टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी म्हटलं आहे. नववर्षानिमित्त टाटा ग्रुपच्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना चंद्रशेखरन यांनी एक पत्र लिहिलं आहे.
बॅटरी, सेमी कंडक्टर, इलेक्ट्रिक वाहने आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील उपकरणं यामध्ये नोकऱ्या कारखाने निर्मिती आणि योजनांमधील गुंतवणुकीतून निर्माण होणार आहेत. या पाच लाख नोकऱ्या सेवा क्षेत्रा व्यतिरिक्त असतील. टाटा ग्रुप गुजरातच्या ढोलेरामध्ये एक सेमी कंडक्टर प्रकल्प आणि आसाममध्ये सेमी कंडक्टर ओएसटी संयंत्र निर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे. टाटा ग्रुपच्या रिटेल क्षेत्रातील कंपन्यांचा विस्तार सुरु आहे. एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २०२५ या वर्षाबाबत आशावादी असल्याचं देखील चंद्रशेखरन यांनी म्हटलं आहे.