बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी शनिवारी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा (Beed Morcha) काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हे सहभागी होणार आहेत. या मोर्चात आजूबाजूच्या ५० गावांमधील नागरिक सहभागी होणार आहेत. बीडमधील सर्वपक्षीय मोर्चासाठी शहरात ४०० अंमलदार, वाहतुकीचे ७० अंमलदार, वरिष्ठ अधिकारी ४ पोलीस उपअधिक्षक, इन्चार्ज ऑफिसर, एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक तैनात असतील. आरसीपीची ६ पथके, राज्य राखीव पोलीस दलाच्या २ एसआरपीएफ कंपनी आणि अधिक अतिरिक्त बंदोबस्त शहरामध्ये तैनात करण्यात आला आहे.
Nylon Manja Ban : नायलॉन मांजा निर्मिती, वापर व विक्री करणाऱ्यावर होणार कडक कारवाई!
मराठा समाजही होणार सहभागी
मस्साजोग (जि.बीड)चे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करा, या मागणीसाठी बीड येथे आयोजित मोर्चात सहभागी होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठा समाजाचे लाखो लोक सहभागी होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
अन्यथा १ जानेवारीला रेणापूरला ‘चक्काजाम’
संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी शुक्रवारी लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. संतोष देशमुख यांची कन्या आणि मुलगा या मोर्चात हजर होते. यावेळी वैभवी संतोष देशमुख हिने एक छोटेखानी भाषण केले. आमच्या परिवाराच्या मागे आपण उभे राहा, या प्रकरणातील दोषी लोकांना तत्काळ जेरबंद करून कडक कारवाई करावी, अशी मागणी संतोष देशमुख यांच्या मुलीने केली. सरकारने ठोस पाऊल नाही उचलले तर १ जानेवारीला रेणापूर येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
सीआयडीच्या अप्पर पोलीस महासंचालकांचा बीड पोलीस ठाण्यात ठिय्या
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना पकडण्यासाठीचा सरकारवरील दबाव वाढला आहे. त्यामुळे बीडमध्ये पोलीस प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे. सीआयडीचे महासंचालक प्रशांत बोरुडे यांच्याकडून हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याची चौकशी केली जात आहे.