सावंतवाडी : विद्यार्थी परिषदेचा इतिहास वेगळा आहे. विद्यार्थ्यांची ताकद भविष्यातील देशाची ताकद आहे. या संघटनेने देशासाठी नेतृत्व करणारे अनेक नेते दिले आहेत. तो इतिहास आपण जपला पाहिजे. त्यासाठी ही संघटना ज्यांनी घडवली, त्यांना अभिमान वाटावे असे कार्य करा. हिंदुराष्ट्रात आपण काम करतो. राष्ट्र प्रथम आपण मानतो. या राष्ट्राला विकसित करण्यासह सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. आपली ती जबाबदारी आहे हे स्वीकारून वागले पाहिजे. आपल्या राष्ट्राकडे वाकड्या नजरेने कोणी पाहू नये यासाठी तुमचे काम कार्य तुमची निष्ठा व तुमचा कडवटपणा हे देखील महत्त्वाचे आहे. हिंदु राष्ट्राचा नागरिक म्हणून हे राष्ट्र सुरक्षित राखण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी ठेवा. तुमच्या या वाटचालीत आम्ही सर्वजण तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत राहू, असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ५९ व्या कोकण प्रांत अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संबोधित करताना नितेश राणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विकसित व समृद्ध कोकणासोबतच सुरक्षित कोकणाची गरज विषद केली.
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी स्वीकारला पर्यावरण व पशुसंवर्धन विभागाचा कार्यभार
ते म्हणाले, समृद्ध कोकण, विकसित कोकणासह आता भगवे कोकण असे मी म्हणेन. कारण हिंदुत्व ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत ही ओळख निर्माण करण्यासाठी फार मेहनत घेत आहेत. मात्र, आपण विकसित राष्ट्राचे स्वप्न पाहत असताना काही जण २०४७ ला हिंदुस्तानला इस्लाम राष्ट्र करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या वेळी विरोधकांकडून होणाऱ्या आक्रमणांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आपल्यात तो कडवटपणा असला पाहिजे. तरच आपल्या देशाकडे कोणी वाकड्या नजरेने पहाणार नाही. दहशत माजवायची हिंमत कोणी करणार नाही. या अधिवेशनात पुढे जात असताना हिंदूराष्ट्राला तुमची मदत होईल अशी भुमिका घेऊन जा, असे आवाहन त्यांनी केले.
हिंदू राष्ट्राला विकसित करण्यासह राष्ट्र सुरक्षित ठेवणेही तेवढेच आवश्यक आहे. ज्या राष्ट्राचे आपण नागरिक आहोत ज्या कोकण भूमीचे आपण प्रतिनिधी आहोत. ती भूमी सुरक्षित ठेवणे ही आपली ती जबाबदारी आहे. बांग्लादेशी, रोहींग्यो मुसलमान आपल्या किनारपट्टीवर मस्ती करू पाहत आहेत. या खात्याचा मंत्री म्हणून त्यांची मस्ती खपवून घेणार नाही. माझ्यावर हिंदूत्वासाठी कार्य करताना ३८ केसेस झाल्या आहेत. धर्मासाठी घेतलेल्या या केसेसचा मला अभिमान आहे. तुमच्यातील अनेक जण भविष्यातील देशाचे नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेसाठी प्रसंगी अशा केसेस घेण्याची तयारी ठेवा, असेही ते म्हणाले.