Friday, March 28, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखमुत्सद्दी राजनीतिज्ञ अटलजी

मुत्सद्दी राजनीतिज्ञ अटलजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी 

आज २५ डिसेंबर हा आपल्या सर्वांसाठी खूप विशेष दिवस आहे. आपला देश आपले लाडके माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची १००वी जयंती साजरी करत आहे. उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे मुत्सद्दी राजनीतिज्ञ म्हणून, ते आजही अगणित लोकांना प्रेरणा देतात. २१व्या शतकात प्रवेश करताना भारताचे स्थित्यंतर घडवणारे शिल्पकार म्हणून, आपला देश अटलजींप्रति सदैव कृतज्ञ राहील. पंतप्रधान म्हणून त्यांनी १९९८ मध्ये शपथ घेतली तेव्हा आपला देश राजकीय अस्थिरतेच्या गर्तेतून बाहेर पडत होता. सत्तेवर येणारी सरकार कसा कारभार करतील याबाबत लोक साशंक होते. अटलजींनीच स्थिर आणि प्रभावी राज्यकारभार देऊन हा प्रवाह उलट दिशेने वळवत परिस्थिती अनुकूलपणे पालटवली.

अटलजींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने, तंत्रज्ञान सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा, प्रयत्न केला. हे करताना सोबत भारताला एकत्र जोडण्याची, जवळ आणण्याची दूरदृष्टी होती. आजही अनेकजण भारतातील मुख्य ठिकाणे चहू दिशांनी जोडणाऱ्या सुवर्ण चतुष्कोन या महामार्ग प्रकल्पाची आठवण काढतात. पंतप्रधान ग्रामसडक योजनेसारख्या उपक्रमांद्वारे स्थानिक दळणवळण वाढवण्याचे वाजपेयी सरकारचे प्रयत्नही तितकेच उल्लेखनीय होते. त्याचप्रमाणे, त्यांच्या सरकारने दिल्ली मेट्रोच्या माध्यमातून दळणवळण व्यवस्थेला-वाहतुकीला चालना दिली. दिल्ली मेट्रो प्रकल्प आज जागतिक दर्जाचा पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून जगात वाखाणला जातो. अशा प्रकारे, वाजपेयी सरकारने केवळ आर्थिक विकासालाच चालना दिली. सामाजिक क्षेत्राचा विचार करायचा झाला, तर सर्व शिक्षा अभियान हा उपक्रम अटलजींनी आधुनिक भारताची उभारणी करण्याचे स्वप्न पाहिले होते. जिथे देशातील सर्वांना विशेषतः गरीब आणि वंचित घटकांना आधुनिक शिक्षण उपलब्ध असेल, ते अधोरेखित करतो. त्याचवेळी त्यांच्या सरकारने अनेक आर्थिक सुधारणा करून भारताच्या आर्थिक उत्थानाचा पाया रचला. जी अर्थव्यवस्था अनेक दशकांपासून घराणेशाहीला प्रोत्साहन देणाऱ्या आर्थिक तत्त्वज्ञानाच्या मार्गावर चालल्यामुळे ठप्प झाली होती. त्यांच्या नेतृत्वाचा दाखला १९९८ च्या उन्हाळ्यात घडलेल्या घटनेतून पाहायला मिळतो. त्यांचे सरकार नुकतेच सत्तेवर आले होते आणि ११ मे रोजी भारताने ऑपरेशन शक्ती या नावाने ओळखली जाणारी पोखरण अणुचाचणी केली.

या अणुचाचणीने भारताच्या वैज्ञानिक समुदायाच्या सामर्थ्याची वेगळी ओळख जगासमोर आणली. भारताने अणुचाचणी केल्याने संपूर्ण जग थक्क झाले आणि त्याचवेळी काही देशांनी याबद्दल विनाकारण आपल्या संतापाचे देखील प्रदर्शन केले. यावेळी एखाद्या सामान्य नेत्याने कच खाल्ली असती, पण अटलजी हे वेगळ्या मातीतून घडलेले नेते होते. भारत खंबीर राहिला आणि दोन दिवसांनी १३ मे रोजी आणखी चाचण्या करण्याचे आदेश देत सरकारने आपला निर्धार दाखवून दिला. ११ मे रोजी झालेल्या चाचण्यांनी वैज्ञानिक कौशल्याचे दर्शन घडवले, तर १३ मे रोजी केलेल्या चाचण्यांनी खऱ्या नेतृत्वाचे दर्शन घडवले. हा संपूर्ण जगाला दिलेला एक संदेश होता की आता ते दिवस मागे पडले आहेत ज्यावेळी भारत कोणत्याही इशाऱ्याखाली किंवा दबावाखाली येऊ शकेल. आंतरराष्ट्रीय दबावानंतरही वाजपेयी सरकार, आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याच्या भारताच्या अधिकाराचे आणि त्याचवेळी जागतिक शांततेचा भारत खंदा पुरस्कर्ता असल्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. भारतीय राजकारणातील आघाड्यांची व्याख्या बदलणाऱ्या रालोआचे अध्यक्षपद अटलजींनी भूषवले. रालोआला विकासाचे, राष्ट्रीय प्रगतीचे आणि प्रादेशिक महत्त्वाकांक्षांचे सामर्थ्य बनवले. त्यांच्या राजकीय प्रवासातून त्यांची संसदीय प्रतिभा दिसून येते. मूठभर खासदार असलेल्या पक्षाचे ते सदस्य होते पण त्यांचे शब्द त्या काळात अति-शक्तिमान असलेल्या काँग्रेसच्या सामर्थ्याला हादरवण्यासाठी पुरेसे होते. एक पंतप्रधान म्हणून त्यांनी विरोधकांच्या टीकेला स्वतःच्या शैलीने आणि विद्वत्तापूर्ण संवादांनी बोथट केले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा बराच काळ त्यांनी विरोधी बाकांवर व्यतीत केला होता पण त्यांनी कधीही कोणा विरोधात मनात कडवटपणा ठेवला नाही. काँग्रेसने त्यांना गद्दार असे संबोधण्यापर्यंतची खालच्या पातळीतील टीका केल्यावरही त्यांनी आपला संयम गमावला नाही.

संधीसाधू डावपेचांचा वापर करून सत्ता मिळवण्याची हाव त्यांना कधीही नव्हती. १९९६मध्ये घोडेबाजार आणि घाणेरड्या राजकारणाच्या मार्गावर चालण्यापेक्षा त्यांनी राजीनामा देणे योग्य मानले. १९९९मध्ये केवळ एका मताने त्यांच्या सरकारचा पराभव झाला. अशा प्रकारच्या अनैतिक राजकारणाला आव्हान देण्याचा सल्ला त्यांना अनेकांनी दिला, मात्र त्यांनी नियमांना अनुसरून वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. शेवटी जनतेनेच त्यांना भव्य बहुमताने पुन्हा एकदा सत्तेवर आणले. ज्यावेळी आपल्या संविधानाच्या रक्षणाचा विषय येतो त्यावेळी अटलजी सर्वांपेक्षा वरच्या स्थानावर दिसतात. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या हौतात्म्याने ते कमालीचे व्यथित झाले होते. त्यानंतर अनेक वर्षांनी ते आणीबाणी विरोधी चळवळीचे प्रमुख स्तंभ बनले. आणीबाणीनंतरच्या १९७७च्या निवणुकांमध्ये त्यांनी आपल्या स्वतःच्या पक्षाचे (जन संघ) जनता पक्षात विलिनीकरण करण्यासाठी सहमती दर्शवली. त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी हा निर्णय नक्कीच वेदनादायी ठरला असेल, अशी माझी खात्री आहे. पण कोणत्याही परिस्थितीत संविधानाचे रक्षण त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. अटलजी भारताचे परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभांमध्ये हिंदी भाषेत भाषण करणारे ते पहिले भारतीय नेते ठरले. त्यांच्या या कृतीतून भारताबद्दलचा त्यांचा अपार अभिमान दिसून येतो. अटलजींचे व्यक्तिमत्त्व हे कोणालाही आपल्याकडे अगदी सहजपणे आकर्षून घेणारे होते. आपल्या जीवन प्रवासात समृद्ध साहित्यकृतींच्या निर्माता असलेल्या या लेखक, कवी मनाच्या व्यक्तिमत्त्वाने आपल्या लेखनात शब्दांचा वापर हा प्रेरणा देण्यासाठी आणि कधी, तर सहवेदना व्यक्त करण्यासाठी केला. त्यांच्या असंख्य काव्य रचनांमध्ये तर त्यांच्या मनातील संघर्षाचे आणि राष्ट्राविषयीच्या आशांचे प्रतिबिंब उमटलेले आपल्याला दिसते.

भारतीय जनता पक्षाच्या माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे तर हे भाग्यच होते की आम्हाला अटलजींसारख्या व्यक्तीमत्त्वाकडून शिकता आले, त्यांना जाणून घेता आले, त्यांच्याशी संवाद साधता आला. भाजपासाठी त्यांनी दिलेले योगदान हे खऱ्या अर्थाने आधारभूत असे मोलाचे योगदान होते. लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या दिग्गज सहकाऱ्यांच्या सोबतीने त्यांनी पक्षाला त्याच्या स्थापनेपासूनच आकार दिला. जेव्हा जेव्हा विचारधारा आणि सत्ता यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली, त्या त्या वेळी त्यांनी कायमच विचारधारेचीच निवड केली. काँग्रेसच्या चष्म्यातून जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनापेक्षा वेगळा असा जागतिक दृष्टीकोन भारतासाठी शक्य आहे आणि असा जागतिक दृष्टिकोन भारताला लाभदायक ठरू शकतो हे देशाला पटवून देण्यात ते यशस्वी झाले. त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त, त्यांच्या आदर्शांची जाणीव जिवंत ठेवण्यासाठी आणि भारतासाठी त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण स्वतःला पुन्हा झोकून देऊ या. सुशासन, एकता आणि प्रगती या त्यांच्या तत्त्वांना मूर्त रूप देणारा भारत घडवण्याचा आटोकाट प्रयत्न करूया. आपल्या देशाच्या क्षमतेवर असलेला अटलजींचा अढळ विश्वास आपल्याला उच्च ध्येय आणि कठोर परिश्रम करण्यासाठी सतत प्रेरणा देत आहे आणि देत राहील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -