मुंबई : २०२४ हे वर्ष सरायला अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत. (New Year resolution) लवकरच २०२५ हे नवे वर्ष उजाडणार आहे. सगळीकडे सरत्या वर्षाला निरोप देण्याची जोरदार तयारी सुरू आहे. तसेच नव्या वर्षाच्या स्वागतासाठीही सारेच उत्सुक आहेत. २०२४ या वर्षाला निरोप देण्याची वेळ आता जवळ आलीय. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी (Happy New Year) अवघे ६-७ दिवस शिल्लक राहिलेत. सर्वांनीच यासाठी जोरदार तयारी केली असणारेय. दरवर्षीप्रमाणेच यंदाही थर्टीफर्स्टच्या पार्ट्या रंगतील. दुसरीकडं मराठी नववर्ष आणि इंग्रजी नववर्ष यांच्यातील वाद हा नेहमीप्रमाणं सुरूच राहील.
काहीजण म्हणतील फक्त कॅलेंडर बदलणार आहे पण आयुष्यात तर नवं काही बदलणार नाही. अशातच अनेकांचा नव वर्षाचा संकल्प करण्याचा प्लानही सुरू होईल. या संकल्पाची किती गंमत आहे नं. वर्षभर खरंतर हा शब्द कोणाच्या लक्षातही नसतो. मात्र एखादा सण आला की जसं त्या सणाशी संबंधित वस्तूंची गर्दी मार्केटमध्ये दिसू लागते, त्याचप्रमाणे नववर्ष आले की संकल्प हा शब्द अनेकदा ऐकू येतो. मग काय नव्या वर्षात काय संकल्प करणार, असा सवालच अनेकांकडून केला जातो.
वर्षानुवर्षे एकाच प्रकारचे संकल्प केले जातात. जुन्या वर्षाला बाय बाय म्हणताना आणि नव्या वर्षाचं वेलकम करताना हा संकल्पांचा विडा उचलला जातो. बऱ्याचदा जुनेच संकल्प पुन्हा नव्यानं घेतले जातात. या संकल्पांची माळ मनात रचली जाते. मात्र हे कितपत यशस्वी होते ते संकल्प करणारेच जाणो.
वजन वाढलेले लोक नव्या वर्षात मी नक्की वजन कमी करेन असा संकल्प करतात, तर पोट वाढलेले लोक पोट कमी करण्याचा संकल्प करतात. पुस्तक वाचण्याची सवय नसणारे लोक नव्या वर्षात पुस्तके वाचण्याचा निर्धार करतात. काहीजण आता पहाटे उठून चालायला जाणार असे ठरवतात. तर काहीजण जीममध्ये जायची तयारी करतात.
हल्ली स्मार्टफोन कमी वापरण्याचा संकल्पही केला जातो. वजन कमी करणे, पोट कमी करणे, चालायला जाणे, व्यायाम करणे, पुस्तके वाचणे, सकाळी लवकर उठणे, फास्टफूड कमी खाणे, स्मार्टफोनचा वापर कमी करणे, घरातल्यांना अधिक वेळ देणे, आवडीचा छंद जोपासणे असे नानाविध संकल्प या नव्या वर्षाच्या सुरूवातीला केले जातात. मात्र ते किती काळ टिकतात हो, हा खरा प्रश्न आहे.
Thirty First Party : ‘थर्टी फर्स्ट’ पार्टी करताय? परवानगी घेतली का?
संकल्प करणे हे काही कठीण नाहीये. मात्र तो टिकवून ठेवणं तितकंच कठीण आहे. सुरूवातीचा आठवडाभर हा संकल्प नित्यनियमानं पाळला जातो. मात्र हळूहळू जसे दिवस पुढे जातात तसतशी संकल्पाच्या फुग्यातील हवा कमी कमी होत जाते आणि एके दिवशी तो हवा निघून गेलेल्या फुग्यासारखा होतो. खरंतर अनेकांचे हेच होत असते. संकल्प केलाच तर तो नित्यनियमानं कटाक्षानं पाळायला हवा. यातूनच सातत्य निर्माण होतं.
जीवनात कोणतेही यश मिळवायचं असेल तर कामामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. हेच संकल्प आपल्याला शिकवतो. एखादी गोष्ट तुम्ही जर सातत्यानं केली तर त्या गोष्टीमध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळतं. त्यामुळं यंदाच्या वर्षी जर संकल्प कराल तर तो सातत्याचा करा. एखाद्या गोष्टीत सातत्य कसं राखता येईल. याचा संकल्प करा आणि तो जरूर पूर्ण करा.
मग, नव्या वर्षातील काय आहे तुमचा संकल्प… (New Year resolution) कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा.