मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बीकेसीमध्ये (BKC) वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सेबी बिल्डिंगपासून अॅव्हेन्यू-५ पर्यंत, बीकेसी कनेक्टर आणि अॅव्हेन्यू-३ (वीवर्क) मार्गे जोडणाऱ्या १८० मीटर सिग्नल-फ्री रस्त्याचे उद्घाटन आज करण्यात आले. अवघ्या ३.५ महिन्यांत, म्हणजेच निश्चित वेळेपेक्षा निम्म्या कालावधीत पूर्ण झालेला हा रस्ता बीकेसी वन जंक्शन आणि बीकेसी कनेक्टर जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
या नव्या रस्त्यामुळे ईस्टर्न एक्सप्रेस वेहून बीकेसीमध्ये येणाऱ्या प्रवाशांना तीन पर्यायी मार्ग उपलब्ध झाले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होणार असून वाहतुकीचा वेग आणि प्रवासाचा अनुभव सुधारला जाणार आहे. ईस्टर्न सबर्ब्जमधून बीकेसीपर्यंत आता अवघ्या १५ मिनिटांत पोहोचता येईल. सहा लेनपैकी तीन लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या असून उर्वरित तीन लेन लवकरच सुरू केल्या जातील. रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी एमएमआरडीएचे सहआयुक्त राधाबिनोद शर्मा, भाप्रसे, आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुम्भारे उपस्थित होते.
नव्या रस्त्याची मुख्य वैशिष्ट्ये
सिग्नल-फ्री कनेक्टिव्हिटी: १८० मीटर लांब, सहा लेनचा (३+३) हा रस्ता सिग्नल-फ्री वाहतूक प्रवाहाची हमी देतो, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचतो आणि सोयीस्कर प्रवास सुनिश्चित होतो.
वाहतुकीचे योग्य वितरण: बीकेसी कनेक्टर, ईईएच आणि अंतर्गत मार्गांद्वारे वाहतूक तीन भागांमध्ये विभागली जाते, ज्यामुळे कोंडी कमी आणि प्रवाह जलद होतो.
हा नवीन रस्ता एनएसईकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीसाठी तसेच एमसीए क्लब, कॉन्सुलेट्स आणि एमटीएनएल यांसारख्या बीकेसीतील महत्त्वाच्या ठिकाणांसाठी थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करतो.
वाहतूक कोंडी दूर करण्याच्या आणि नागरी गतिशीलता सुधारण्याच्या दिशेने एमएमआरडीएने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे, महानगर आयुक्त, एमएमआरडीए म्हणाले, “हा नवीन रस्ता बीकेसीला अधिक प्रवेशसुलभ आणि प्रवासी-अनुकूल बनवण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. ईस्टर्न एक्सप्रेस वेहून बीकेसीपर्यंत जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याबरोबरच, हा रस्ता बीकेसीमधील वाहतुकीचे नियोजनबद्ध वितरण सुनिश्चित करतो, ज्यामुळे बीकेसीचे जागतिक व्यवसाय केंद्र म्हणून स्थान अधिक बळकट होते. अवघ्या ३.५ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करणे ही एमएमआरडीएच्या कार्यक्षमता आणि उत्कृष्टतेची जाणीव आहे.”एमएमआरडीए मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक स्तरावरील शहरी केंद्र बनवण्यासाठी कार्यक्षम, टिकाऊ आणि भविष्यकालीन पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे.