Thursday, May 15, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

मुंबईबाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईत हक्काचे घर मिळवून देणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईबाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईत हक्काचे घर मिळवून देणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोकणाच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना


नागपूर:  विकासकांनी अर्धवट सोडलेल्या व रखडलेल्या धोकादायक इमारतींमुळे मुंबईकर मुंबईबाहेर गेला आहे. अशा बेघर व मुंबई बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईत हक्काचे घर मिळवून देत त्यांना पुन्हा मुंबईत आणण्याचे काम शासन करणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत सदस्य प्रविण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावरील चर्चेदरम्यान दिली.


उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, रखडलेल्या व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासनाने एमएसआरडीसी, एमआयडीसी, बीएमसी, म्हाडा, एसआरए, सिडको या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने योजना हाती घेतली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 2 लाख घरे पूर्ण करण्यात येणार आहे. सहभागी यंत्रणांना प्रत्येकी दोन ते तीन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी देण्यात येतील. स्वयंविकासाच्या माध्यमातूनदेखील प्रोत्साहन देवून रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. अशा योजनेची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी ठाणे शहरात सिडको आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.


कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी तसेच सण आनंदात व शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस रस्त्यावर असतो. ऊन, पाऊस, वारा कुठलीही पर्वा न करता पोलीस आपले कर्तव्य बजावित असतो. पोलीसांना कुटुंबाची, घराची चिंता असता कामा नये, त्यासाठी काम करण्याची भूमिका शासनाने घेतली आहे, पोलीसांच्या घरांविषयी सरकार सकारात्मक आहे. दुरावस्थेत असलेल्या पोलीस वसाहतींचा विकास करण्यात येईल, असेही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


उपमुख्यमंत्री म्हणाले, कोकणाच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. या प्राधिकरणाला निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोकणातून ६५ टीएमसी वाहून जाणाऱ्या पाण्याच्या उपयोगासाठी छोटे, मोठे बंधारे बांधण्यात येणार आहे. कोकणात जलसंधारणाच्या कामांतून पाणी अडवून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सागरी किनारा रस्त्याचे काम गतीने सुरू आहे. कोकणात ८ पुलांना मान्यता दिली आहे. तसेच मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवेश नियंत्रीत हरीत महामार्ग शासन करणार आहे. यामुळे कोकणात निश्चितच पर्यटनाला चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment