हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ३५,७८८ कोटींच्या पुरवणी मागण्या
नागपूर : नागपूरमध्ये सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून ३५,७८८.४० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये १४०० कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली. विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना आर्थिक अडचणीमुळे गुंडाळली जाण्याचा विरोधकांकडून आरोप केला जात असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीणसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद करताना विरोधकांच्या आरोपातील हवा काढून टाकली आहे.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सोमवारच्या पहिल्या दोन्ही सभागृहात २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ३५ हजार ७८८ कोटी ४० लाख ५७ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. या पुरवणी मागणीत सर्वाधिक ७ हजार ४९० कोटी सार्वजनिक बांधकाम विभागासाठी तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठी राज्य सरकारचे दुय्यम कर्ज आणि समभागासाठी १ हजार २१२ कोटी तर मोदी आवास घरकुल योजनेसाठी १ हजार २५० कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत आहे.
Grinder Machine Kills : ग्राईंडर मशिनने घेतला १९ वर्षीय मुलाचा जीव; आधी शर्ट अडकून खेचला गेला …
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत पुरवणी मागण्या सादर केल्या. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना महायुती सरकारने जुलै महिन्यातील अधिवेशनात विक्रमी ९४ हजार कोटी रुपयांच्या मागण्या सादर केल्या होत्या. यावेळी सरकारने पुरवणी मागणीतून निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या योजनांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी ५१४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सोमवारी सादर झालेल्या पुरवणी मागण्यांवर १९ आणि २० डिसेंबर अशी दोन दिवस चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील.
राजकोटवरच्या शिवरायांच्या पुतळ्यासाठी राज्य सरकारकडून ३६ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. या पुतळ्याचे कंत्राट सुप्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांना देण्यात आले आहे. पुरवणी मागण्यांपैकी ७ हजार ४९०.२४ कोटी रुपयांचा निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार आहे. त्यापैकी ३ हजार १९५ कोटी रुपये हे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला बिनव्याजी देण्यात आले आहेत. पुरवणी मागण्यांपैकी ३ हजार ५० कोटी रुपयांचा निधी हा मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज अंतर्गत वापरण्यात येणार आहे.