पूर्णिमा शिंदे
निजवते भुक्यापोटी तिले रात म्हणू नये, आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नही, संतश्रेष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या या काव्यपंक्ती. अखंड जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी अक्षर योगिनी बहिणाबाई माझ्या सर्वात आवडत्या कवयित्री. कडाक्याची थंडी पडली. भुकेने कासावीस रस्त्याच्या कडेला असणारी अजान बालके, निराधार माणसे पाहिली की लक्षात येते अन्नाचे महत्त्व. आपण आपल्या ताटामध्ये रोज किती अन्न फेकून देतो. मनात आलं दिवा किती रहे भीषण दारिद्र्य, भयान चित्त थरारक विदारक असे दृश्य दोन वेळचे… अन्न ताटात मिळणेही भाग्यात असावे लागते. असे म्हटले जाते की, ज्याने चोच बनवली तो चाराही देणारच. पण तो चारा घरात, मुखात येण्यासाठी खूप सोसावे लागते. त्या प्रक्रियेत आणि कृतीत सामावलेले असतात. एक दाणा पेरला की त्याचे हजारो दाने निसर्ग आपल्याला देत असतो. पण तसे निसर्गातील तहान-भूक या सुद्धा दोन जाणीवा आहेत. सजीवांना जिवंत राहण्यासाठी तहानभूक असणं. जगण्याचे बळ देण्याचे इंधन पेरणी लागवडीपासून ते खळ्यातलं धान्य दळून घरात पीठ येईस्तोवर या साऱ्या प्रक्रियांना आपल्याला सामोरे जावे लागते. तेव्हा कुठे ताटात अन्न येते. पण हेच अन्न आपल्याला आवडले नाही म्हणून आपण नाव ठेवतो, टीका करतो, फेकून देतो, नासाडी करतो, अपमान करतो. त्या अन्नाचे महत्त्व फक्त भुकेल्या पोटालाच असते. कारण भुक्या पोटी नीज येणार कशी? आपल्याला दोन पायांवर उभे करण्यासाठी जगण्याचे बळ श्रम करण्याची शक्ती ऊर्जा, उत्साह, प्रसन्नता देते ते अन्न.
माणसाला जगण्यासाठी अन्न हे त्याचे इंधन आहे. ते वेळच्या वेळी पोटात गेलेच पाहिजे. भुकेल्यास अन्न, तहानलेल्या पाणी देणे ही आपली संस्कृती. आपल्या काव्यपंक्तीतून जीवन असे तत्त्वज्ञान एका ओळीत सांगताना ‘‘जगा आणि जगू द्या’’ असा संदेश संत महंतांनी दिलेला आहे. तोच आपल्या ओळींतून बहिणाबाईंनी सुद्धा दिलेला आहे. निसर्गदेखील आपल्याला भरभरून देत असतो. आपण माणसांनीही त्याच्याकडून शिकलं पाहिजे. जसे दारी आलेले गोसावी, योगी, साधू, भिक्षुक यांना देखील आपण पोटभर अन्न, भरभरून जेवू घालावे. कोणालाही विणमुख जाऊ देऊ नये. दारी आलेल्यांच्या झोळीतही योग्य ते दान द्यावे. ही भिक्षा आहे दक्षिणा आहे मग ते पीठमीठ, जोगवा, तेल, तूप जे काही असेल द्यावे. तेथे दानधर्म करावा.
आपण परगावहून आलेल्या कोणालाही आपल्या गावचा वानोळा देत असतो. हा वानवळा म्हणजे काय असतो हा भौगोलिक परिस्थितीवर असतो. मुठभर का होईना आपण आपली साठवलेली शिधा देतो. जे हाती मिळेल ते उदा. भुईमूग, ज्वारी, बाजरी, हुरडा, कुरडया, पापड्या, चिंच, आंबा, कैऱ्या इ. तर काही भागात माणसं तांदूळ, मका, नाचणी, कोकम, काजू, आंबे, फणस असा वानोळा देत असतात. तो काही आयुष्यभर पुरत नसतो पण चालीरीती म्हणून आपण माणुसकी म्हणून देत असतो आणि देत राहिल्याने वाढतं त्याला दान म्हणतात. माणुसकीच्या धर्मातून ते द्यावे लागते आणि जोपासावे लागते. आजकाल या जुन्या रीती कमी होऊ लागल्या आहेत. कोणाला काही द्यायचे म्हटले की हात आखडता जातो. निजवते भुक्या पोटी तिले रात म्हणू नही, आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नये. आता प्रश्न येतो “आखडल्या हाताचा “ ही जी पुढची ओळ आहे ती दान, देणगी, धर्म यासाठी आहे. खूप सारे आपल्याकडे मणभर आहे पण कणभर का होईना आपल्याला लोकांना देताना आपल्या बुद्धीचा संकोच वाढतो. अशी वृत्ती आज दिसून येते. दारी आलेल्या पाहुण्यांचं आगतस्वागत करणे दूरच. अहो! मग फोन करून का नाही आलात? जेवण तरी करून ठेवलं असतं, तर चहा घेणार का? असे म्हणणारे मंडळी पाहिलेत. हळूहळू माणूसकी दूर होऊ लागली.माणसामाणसांत अंतर पडले. माणुसकी दुरापास्त झाली. नात्यांमध्ये दुरावा वाढत गेला.
एकीकडे पॅकेज युग सुरू झालं आणि माणसं भाकरीला दुरावली आहेत. काय ही दुरावस्था. पूर्वी कसं भरलं गोकुळ, भरलं टोपलं असायचं. चेहऱ्यावरचा सात्विक आनंद ओसंडून वाहायचा. आता अनेक वर्षांनी किंवा कधीतरी आयुष्यात एकदाच घरी आलेल्या पाहुण्याला सुद्धा शेजाऱ्यासारखी वागणूक दिली जाते. कारण की, आत्मीयता आणि जिव्हाळा दुरापास्त झालेला आहे अतिथी देवो भव! ही संस्कृती लोक पावत चालली आहे. नेमका… टपकला. कधी जातायेत काय माहिती? असा अविर्भाव असेल तर परत कोण कोणाकडे जाणार? लोकांकडे स्वतःची कामे असली की स्वार्थापायी लोकांची उंबरे शिजवणारे लोकही पाहिलेत. कधी काही काम नसतानाही चांगलं आदरातिथ्य करणारी माणसेही पाहिली. एक तर या धक्काधक्कीच्या धावत्या युगात कोणाला वेळ असतो कोणाकडे जायला? कामाशिवाय खानपान, चहापाणी, देणंघेणं यापेक्षा माणसांना प्रेमाने भरभरून कौतुक, प्रोत्साहन, प्रेम द्यावे.
यात सारे काही येतं. बस्स इतकच ! तरी देखील अतिथी देवो भव! ही संस्कृती जपायलाच हवी नाही का? अन्न हे पूर्णब्रह्म आहे. अन्नदान करणे यासारखे महत्त्वपूर्ण काही नाही आणि अन्नपूर्णा जर आपल्यावर प्रसन्न असेल तर निश्चित आपल्या शरीराचे पालनपोषण आपण चांगल्या पद्धतीने करून आपले त्याचे पावित्र्य आणि मानसिक संतुलन हे अन्नामुळे चांगले राहण्यास नक्कीच मदत होईल. देवी अन्नपूर्णेचा निवास आपल्या घरादारांत, आयुष्यात, जीवनात होईल अशा पद्धतीने अन्नाचा सन्मान करू. भुकेल्याचा सन्मान करू आणि आपल्या जुन्या चालीरीती, रिवाज अंगीकारू.
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥