Tuesday, February 11, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीनाम सहजपणे येणे याचे नाव ‘अजपाजप’

नाम सहजपणे येणे याचे नाव ‘अजपाजप’

श्री गोंदवलेकर महाराज

एक चांगला गृहस्थ होता. त्याला कसलेही व्यसन नव्हते. त्या गावात एक दिवस एक बुवा आला. या सद्‌गृहस्थाला भविष्याचा नाद होता. त्याला कुणी सांगितले की, हे आलेले बुवा भविष्य अती उत्तम सांगतात. तो त्यांना भेटायला गेला; परंतु ते गांजा ओढीत होते. त्याला काही तो वास सहन झाला नाही. तरीही, भविष्य ऐकण्यासाठी म्हणून तो एका कोपऱ्यात बसून राहिला. असे बरेच दिवस गेले. होता होता त्याला बुवा फार आवडू लागले; त्याप्रमाणे तो रोज तिथे जात असे. एक दिवस बुवांनी सांगितले म्हणून त्याने चिलमीत निखारा ठेवला; दुसरे दिवशी फडके ओले करून दिले. पुढे त्याला एकदा बुवांनी सांगितले म्हणून त्याने एक झुरका घेऊन पाहिला; आणि हळूहळू सवयीने तो इतका तरबेज झाला की, त्याने गांजा ओढण्यात गुरूलाही मागे टाकले ! असा हा संगतीचा परिणाम फार मोठा होत असतो. ज्याची संगत केली असता भगवत्प्रेम प्रकट होते, तो संत जाणावा. अशाची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी.

श्रीरामप्रभूला आवडणारे ‘नाम’ घेऊन मारुतीरायांनी त्याला आपलासा करून घेतला. ते नाम तुम्ही अत्यंत श्रद्धेने घ्या, भगवंताला आपलासा करून घेणे तुम्हालाही अगदी शक्य आहे. नाम कोठेही घ्या, कोणत्याही वेळी घ्या, कितीही हळू घ्या, पण ते श्रद्धेने घ्या, म्हणजे ते भगवंतापर्यंत खात्रीने पोहोचू शकेल. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी प्राणायाम, योगासने इत्यादी साधने सांगितलेली आहेत; परंतु त्याहून जास्त महत्त्वाचे म्हणजे भगवंताची सहजभक्ती. भगवंताचे नाम सहजपणे येणे याचेच नाव ‘अजपाजप’ होय. हा भक्तीचा प्रकार अत्यंत श्रेष्ठ आहे. यात मीपणाचा शेवट आहे. मीपणा जाणे हीच भगवंताशी खरी अनन्यता होय. भगवंताची पूर्ण कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच होय.

परमार्थ म्हणजे आपली ‘सहजावस्था’ झाली पाहिजे; आणि तशी व्हायला अंतरंगाची ओळख करून घ्यायला पाहिजे, म्हणजेच अंतर्मुख बनायला पाहिजे. भगवंताच्या नसणेपणाने उठलेले वारे म्हणजे काळजी होय. मनुष्याच्या सर्व दु:खांवर, आजारांवर, आनंद आणि समाधान हे खरे औषध आहे. जो सदाचरणात आणि भगवंताच्या नामात राहतो, त्याला हे औषध सहजी लाभत असते. या औषधाचा परिणाम नकळत आणि सहजी होत जाऊन तो शेवटपर्यंत टिकून राहतो. आनंदमय राहण्याकरिता भगवंत हवा. भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय. मन आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे नाम. या नामात आपले सर्वस्व गुंतवले, तर आपल्याला भगवंतापर्यंत सहज जाता येईल.

तात्पर्य: एकदा माणूस नामस्मरण करण्यात तल्लीन झाला की, मनुष्य स्वतःला विसरेल आणि जगालासुद्धा विसरेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -