नवी दिल्ली : राहुल गांधींचा संभल दौरा म्हणजे केवळ माध्यमांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न असल्याची टीका भाजपने केली आहे. दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ता डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी ही टीका केलीय.
राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांनी बुधवारी हिंसाचारग्रस्त संभल शहराला भेट देण्याची योजना आखली होती. नियोजीत कार्यक्रमानुसार राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा सकाळी 10.15 वाजता दिल्लीहून निघाले. हे लोक दुपारी 1 वाजेपर्यंत संभल येथे पोहचण्याची शक्यता होती. त्यांच्यासोबत उत्तरप्रदेशातील काँग्रेस खासदारांचा एक गट देखील होता. राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांना दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेवरच्या गाझीपूर सीमेवर रोखण्यात आले. त्यांना संभलला जाण्यासाठी मनाई करण्यात आली. त्यामुळे राहुल आणि प्रियंका यांना परत यावे लागले.
त्यानंतर दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, राहुल गांधींचा संभल दौरा केवळ दिखावा आहे. काँग्रेस आपल्या राजकीय नाईलाजामुळे असे करत असल्याचा दावा त्रिवेदी यांनी केला. तसेच संसदेत विरोधक एकत्र नाहीत. हिवाळी अधिवेशनात विरोधकांमध्ये एकमत नाही. अधिवेशनात इंडी आघाडी तुटली असून यासाठी काँग्रेस जबाबदार आहे, असाही आरोप त्रिवेदींनी केला.