खोटं बोलणारी व्यक्ती स्वतःला फसवते, समोरच्याला नाही. अनेकदा कोणी आपल्याशी खोटं बोललं की, आपल्याला वाईट वाटतं, दुःख होतं, राग येतो. आपल्याला आधीच सत्य माहीत असतं, पण ज्याच्याकडून ते ऐकायला हवं तो जेव्हा लपवतो, फसवतो, भलतंच सांगून वेळ मारून नेतो तेव्हा याचा आपल्यावर विश्वास नाही का? आपल्याला खरं सांगायला हा पात्र समजत नाही का किंवा आपल्याला तेवढं जवळचं स्थान याच्या मनात नाही का, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. हेच खोटं जर आपल्या घरातील, नात्यातील, जिव्हाळ्यातील व्यक्ती बोलली, तर अजूनच भावना दुखावल्या जाऊन आपण दुःखी होतो. आपण जर एखाद्याशी कायम प्रामाणिक असू, खरे असू तर आपली अपेक्षा तीच असेल पण दुर्दैवाने तसं होत नाही. लोकं खोटं बोलतात, खोटं वागतात, खोटी माहिती पसरवतात, का केले जाते असे? काय असते यामागील मानस शास्त्रीय कारण? काय आहे खोट्या स्टोऱ्या, अफवा पसरवण्यामागील सायकोलोजी जाणून घेऊयात आजच्या लेखातून.
मीनाक्षी जगदाळे
खोट्या नेरेटिव्ह किंवा माहिती म्हणजेच प्रेपोगंडा, डिस इन्फॉर्मशन आणि मिस इन्फॉर्मशन. खोट्या नेरेटिव्ह हा अनेकदा दुसऱ्याची बदनामी, निंदा करायला वापरला जातो. एखाद्याला वाईट सिद्ध करायला आपल्याकडे काहीही सबळ मुद्दे नसतील तर खोटे मुद्दे, कथा, घटना रचून त्या समाजाला सांगितल्या जातात. समाजकारण, अर्थकारण, राजकारण यात आपण याचा सर्रास वापर होताना बघतो. डिस इन्फॉर्मशनमध्ये खोट्या माहितीचा वापर डोक्यामध्ये चुकीचा हेतू ठेवून दुसऱ्याच्या नुकसानीसाठी केला जातो. दुसऱ्या व्यक्तीचं नुकसान करण्यासाठी, त्याला व्यवसाय, कार्यालय, स्पर्धा ज्या ठिकाणी तो आपल्या पुढे जाईल असं वाटतं आहे त्या ठिकाणी त्याला मागे खेचायला त्याला बदनाम करून त्याचं यश-अपयशात कसं रूपांतरित होईल हा हेतू मनात ठेवून केलं जातं. वैयक्तिक पातळीवर खोटे नरेटिव्ह यांना सामोरे जाणे, आपण आपल्या बाबतीत काय माहिती सांगतोय याने आपल्या बाबतीत पसरणारी खोटी माहिती कमी होऊ शकते. कन्फर्मशन बायस म्हणजेच समजा एखादी हिंदू मुलगी मुस्लीम मुलासोबत विवाह करते तेव्हा आपण समजतो हे लव्ह जिहाद आहे. कारण आपल्या डोक्यात ते पक्क बसलेले आहे.
एखादा व्यक्ती माझ्याशी चुकीचा वागला आहे आणि कालांतराने परत त्याच्याबद्दल आपल्याला काही चुकीचं कळलं तर आपल्याला शिक्कामोर्तब होईल की ही व्यक्ती चुकीचीच आहे आणि कायम असते. एनकरिंग बायस म्हणजेच एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबद्दल काही माहिती सांगितली तर आपण त्या माहितीवर विश्वास ठेवून यापुढे मिळणाऱ्या त्या संदर्भातील प्रत्येक माहितीला या माहितीचा आधार जोडूनच विचार करेल. यावेळी पहिली माहिती खोटी जरी असेल तरी आपण ती कन्फर्म न करता कायम मनात ठेवतो. मोटिवेटेड रिजनिंग म्हणजेच कशाबद्दल पण संपूर्ण माहिती घेऊन मग निष्कर्ष काढणे हा योग्य रस्ता न वापरता आपल्याला जो निष्कर्ष हवा आहे त्यानुसार आपला अभ्यास करतो. आपल्या सोयीस्कर पद्धतीने त्या व्यक्ती अथवा परिस्थितीबद्दल अनुमान काढतो. कॉग्नेटिव्ह बायसेस म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह रिऍलिटी आणि सब्जेक्टिव्ह रियालिटीमधील समन्वय. ऑब्जेक्टिव्ह रिऍलिटी म्हणजेच जगात खरोखर काय चालू आहे, सत्य काय आहे ते आणि सब्जेक्टिव्ह रिऍलिटी म्हणजेच आपल्या डोक्यात, मनात त्याबद्दल काय चालू आहे ते. या दोन्हीचा ताळमेळ व्यवस्थित बसला तर आपण नीट विचार करू शकतो. अन्यथा आपली तर्क लावण्याची (म्हणजेच लॉजिकल थिंकिंग) शक्ती कमी होऊ शकते. यामुळे मुख्यत: आकार्यशील आणि ध्रुवी कृत व्यक्ती आणि समाजाचे निर्माण होते.
फाल्स स्टेटमेंट (खोटी विधान) हा फाल्स नरेटिव्हचा मूलभूत घटक आहे. याचे गुणधर्म म्हणजे हेतू! खोटी माहिती पसरवण्याचा हेतू हा अनेकदा वेड्यात काढण्यासाठी किंवा खऱ्या माहितीच्या आभावामुळे होतो. खूपदा लोकांना खरं माहितीच नसतं अशा वेळी समोरचा जे आणि जसं सांगेल तसं त्यांना खरं वाटतं. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय सर्व स्तरावर याचा वापर होतो. उदाहरणार्थ एखाद्या कुटुंबातील एकाच व्यक्तीने हत्ती हा प्राणी कसा असतो ते पाहिलेलं आहे. त्या घरातील इतर लोकांना हत्तीबद्दल काहीही माहिती नाही, त्यांनी कधी नाव पण ऐकलं नाही, फोटो पण पाहिला नाही. या घरातील सर्वजण त्या एका व्यक्तीवर प्रचंड विश्वास ठेवतात. आता ही व्यक्ती जर त्या लोकांना बोलली की हत्ती एक फूट उंच असतो, त्याला दोन पाय असतात, तो मांसाहारी असतो आणि हत्ती पाळीव प्राणी आहे. तर हे सर्व लोकं या माहितीवर शंभर टक्के विश्वास ठेवतील. यांच्यामधील एकजण जरी थोडाफार शहाणा अथवा अधिक शहानिशा करणारा, अथवा डोळे झाकून विश्वास ठेवणारा असा नसेल तर तो स्वतः हत्ती या प्राण्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करील, सर्व ताकद पणाला लावेल, सर्व माध्यमातून माहिती घेईल, अजून चार लोकांचा सल्ला घेईल आणि त्याला खरा हत्ती समजेल. पण जे बाकीचे असतील ते मात्र आयुष्यभर हत्तीची चुकीचीच कल्पना मनात धरून जगतील, आपण वेड्यात निघालो आहोत हे सुद्धा त्यांना कधीही कळणार नाही. म्हणून समोरचा जे काही सांगतोय ती गोष्ट कितपत खरी आहे ते दहा बाजूंनी विचार करून त्यावर अनुमान काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे.क्रमश: