मेंदू मृत महिलेचे वसईतच अवयव दान होऊन मिळाले सहा लोकांना जीवनदान
नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे, २३ नोव्हेंबर रोजी, घरात काम करताना उलट्या होऊन अचानक डोके दुखू लागले व नंतर बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत ५० वर्षीय महिलेला नालासोपारा येथील रिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचार सुरू करण्यात आले. तिला शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टरांनी तीन दिवस शर्तीचे प्रयत्न केले. तातडीने मेंदूचे ऑपरेशन करून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने डॉक्टरांनी सिटीस्कॅन व ॲप्निया टेस्ट द्वारे मेंदूची तपासणी केली असता ती मेंदूमृत असल्याचे निष्पन्न झाले.
हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रुग्णाच्या कुटुंबीयांना तशी खबर दिली आणि त्यांना अवयवदानाचे महत्त्व पटवून सांगितले. उत्तरा दाखल नातेवाईकांकडून नकार मिळाल्या नंतर, रिद्धी विनायक हॉस्पिटलचे समन्वयक सागर वाघ यांनी दी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांना समुपदेशनासाठी पाचारण केले. पवार यांच्या प्रभावी संवाद व समजावणीमुळे कुटुंबीयांनी अखेर अवयवदानासाठी सहमती दिली.
२८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरच्या (ZTCC) निर्देशांनुसार रुग्णाच्या अवयवांचे नियमाप्रमाणे मध्यरात्री उशिरापर्यंत वितरण करण्यात आले. एक किडनी केईएम हॉस्पिटल (परळ) येथे प्रत्यारोपित करण्यात आली, तर दुसरी किडनी अपोलो हॉस्पिटल येथील रुग्णावर प्रत्यारोपित झाली.
जुपिटर हॉस्पिटल ठाणे येथील रुग्णावर एक लिव्हर प्रत्यारोपित करण्यात आले. ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरने त्वचा स्वीकारली. रिद्धी विनायक हॉस्पिटलच्या टीमने डोळ्यांचे दोन कॉर्निया सुरक्षितपणे सहियारा आय बँकेत सुपूर्द केले. या प्रक्रियेत एका व्यक्तीच्या अवयवादानामुळे अवयवांच्या प्रतीक्षा यादीत असलेल्या सहा जणांना नवजीवन मिळाले.
या संपूर्ण अवयवदान प्रक्रियेत रिद्धी विनायक हॉस्पिटलचे डॉक्टर व्यंकट गोयल, डॉ प्रणय ओझा, डॉ निमेश जैन, आणि महत्वाचे म्हणजे हॉस्पिटलचे मुख्य समन्वयक सागर वाघ, हॉस्पिटलचे इतर डॉक्टर व स्टाफ तसेच नालासोपारा पश्चिम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विलास वळवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मोरे, श्री पठाण, पोलीस हवालदार गिऱ्हे, साहेब आदींनी मोलाचे सहकार्य केले.
दोन दिवस आणि रात्र चाललेल्या या अवयवदान प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व संबंधितांचा गौरव करत, रिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये अवयव दान प्रक्रिया सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाचा मार्ग सुलभ झाला आहे याबद्दल मुख्य समन्वयक पुरुषोत्तम पवार यांनी समाधान व्यक्त केले.