मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन कोणत्या देशात होणार यावरून सातत्याने वाद सुरू आहे. मात्र त्याआधीच पाकिस्तानची स्थिती खूपच खराब होत चालली आहे. इस्लामाबादमध्ये सुरू असलेल्या राजकीयविरोधी आंदोलनाचा फटका खेळांवर दिसून येत आहे.
पाकिस्तानातील हिंसक आंदोलनामुळे श्रीलंकेच्या संघाने दौरा अर्धवट सोडत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका ए संघाची वनडे मालिका पाकिस्तानात खेळवली जात होती. मात्र ही मालिका मध्येच सोडून श्रीलंकेचा संघ मायदेशी परतला आहे. याबाबत श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बातचीत केल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली.
या चर्चेनंतर या मालिकेतील दोन एकदिवसीय सामने रद्द करण्यात आले आहेत. हे दोन्ही सामने रावळपिंडीमध्ये खेळले जाणार होते. यानंतर आता ही मालिका पूर्ण करण्यासाठी भविष्यात कार्यवाही करण्यात येईल असे पाकिस्तान बोर्डाने सांगितले.
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक ए इन्साफने रविवारपासून मुख्य इस्लामाबादच्या दिशेने विरोध प्रदर्शन सुरू केले आहे. या दरम्यान अनेक हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.