मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीने महाविकास आघाडीला तोंडावर पडल्याने राज्यात आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी नेत्याची निवड करण्यासाठी महायुतीमध्ये बैठकांचे सत्र चालू झाले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेनं दुसरा क्रमांक मिळवलेला आहे. त्यामुळे महायुतीच्या या कार्यकाळात मुख्यमंत्री कोण होणार? आणि उपमुख्यमंत्री कोण होणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. महायुती सरकारचा कार्यकाळ आज संपुष्टात येत असल्याने सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हाती सोपवला आहे. आता या तिघांच्याही राजीनाम्यानंतर १४ वी विधानसभा विसर्जीत झालेली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राजभवन येथे पोहोचले. यावेळी या तिघांनीसुद्धा आपापले राजीनामे राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे सोपवले. यावेळी तिथे मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंत्री दादा भुसे सुद्धा उपस्थित होते. यावेळी राजीनाम्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करत राज्यपालांनी या तिघांचे राजीनामे स्वीकारले. मात्र, नवे सरकार स्थापन होईपर्यंत राज्याच्या काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडेच सोपविण्यात आली आहे. परंतु, आता राज्यात महायुतीची सत्ता येणार हे माहीत असले तरी महायुतीतून मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात?
महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप असल्यामुळे मुख्यमंत्रिपदावर भाजपा ठाम आहे. भाजपातील नेत्यांकडून तशी भूमिका घेतली जात आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत महायुतीने शिंदे यांचाच चेहरा समोर ठेवलेला आहे. एकनाथ शिंदेचं लाडकी बहीण योजनेचा प्रचार करताना समोर होते. महायुतीला त्यांच्यामुळेच यश मिळाले आहे. त्यामुळे किमान अडीच वर्षे तरी शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी भूमिका शिवेसना पक्षातील नेत्यांची आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्रिपदी फडणवीसच!
महायुतीमध्ये कोणताही मुख्यमंत्रिपदाबाबत फॉर्म्युला ठरविण्यात आला नव्हता. ज्यामुळे महायुतीकडून निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा अद्यापही मुख्यमंत्रिपदासाठीचे नाव निश्चित करण्यात येत नसल्याचचं पाहायला मिळत आहे. मात्र दिल्लीतून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपद या सूत्राप्रमाणे ज्यांच्या जास्त जागा त्यांना भाजपा स्वतःकडेच मुख्यमंत्रिपद ठेवणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भाजपाने या निवडणुकीत १३२ जागांचा विक्रमी आकडा गाठला आहे. २०१४ मध्ये मोदी लाटेत भाजपाने १२२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २०१९ मध्ये भाजपाचे १०५ जण निवडून आले हेते, पण भाजपाने यावेळी १३२ जागा जिंकून मोदी लाटेचा रेकॉर्डही चांगलाच मोडला आहे. अशातच नव्या सरकार स्थापनेसाठी आणि मुख्यमंत्रिपदाची निवड करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावरही मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.