Monday, February 17, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वAdani: अमेरिकेत अदानी,‘जिओस्टार’ची सद्दी

Adani: अमेरिकेत अदानी,‘जिओस्टार’ची सद्दी

सरत्या आठवड्यामध्ये उद्योगजगताशी अनेक लक्षवेधी घडामोडी वाढल्या. गौतम अदानींनी अमेरिकेत दहा अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे घोषित केले, तर ‘जिओस्टार’च्या निमित्ताने ‘डिस्ने’ आणि ‘रिलायन्स एंटरटेनमेंट’चे बहुचर्चीत विलीनीकरण तडीस गेले. दरम्यान, वाढत्या महागाईने अदानी, अंबानींचीही झोप उडवल्याचे दिसून आले, तर देशात ‘एआय’मुळे रोजगारवृद्धी होणार असल्याचे अलीकडेच समोर आले.

महेश देशपांडे

उद्योगजगतात किंवा उद्योगजगताशी संबंधित हालचाली अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढल्या. देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या गौतम अदानी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अदानी यांनी त्यांच्या अदानी समूहामार्फत अमेरिकेत दहा अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. देशात ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात दहा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे वचन त्यांनी दिले आहे. गौतम अदानी यांनी एक्सवर एका पोस्टद्वारे ही घोषणा केली. अदानी यांनी अमेरिकेच्या नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन करताना १५ हजार नोकऱ्या निर्माण करण्याच्या उद्दिष्टासह, अमेरिकन ऊर्जा सुरक्षा आणि मजबूत पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये कौशल्याचा लाभ घेण्यासाठी आणि दहा अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यावसायिक संबंध दृढ करण्याच्या दिशेने पावले उचलण्याचे त्यांनी सूचित केले. एक्सवरील या पोस्टनंतर हे स्पष्ट झाले आहे, की अदानी समूहाने भारत आणि अमेरिका यांच्यातील खोल व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी पावले उचलली आहेत. अमेरिकेत सुरू होणाऱ्या प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली नसली, तरी ऊर्जा आणि पायाभूत सुविधांचा उल्लेख करून त्यांनी या क्षेत्रात सातत्याने गुंतवणुकीच्या माध्यमातून द्विपक्षीय सहकार्याचे भारताचे वचन पूर्ण केले जाईल, असे स्पष्ट केले. सहा नोव्हेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष होणार असल्याची घोषणा करण्यात आली, तेव्हा अदानी यांनी ट्रम्प यांचे अभिनंदन करणारी पोस्ट लिहिली होती. त्या पोस्टमध्ये अदानी यांनी पृथ्वीवर चिकाटी, संयम, अथक दृढनिश्चय आणि एखाद्याच्या विश्वासावर खरे राहण्याचे धैर्य यांचे प्रतीक असलेली एखादी व्यक्ती असेल तर ती म्हणजे ट्रम्प, असे लिहिले होते.

दरम्यान, डिस्ने आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांचे विलीनीकरण पूर्ण झाले. दोन्ही कंपन्यांनी विलीनीकरण पूर्ण झाल्याची घोषणा केली. आता भारतातील सर्वात मोठी करमणूक कंपनी असण्यासोबतच ‘जिओस्टार’ एक स्पोर्टस पॉवर हाऊसदेखील असेल. स्पर्धा आयोग आणि इतर नियामक प्राधिकरणांच्या मंजुरीनंतर रिलायन्सची उपकंपनी ‘व्हायाकॉम-१८’ आणि ‘डिस्ने इंडिया’चे विलीनीकरण प्रभावी झाले आहे. या संयुक्त उपक्रमासाठी ‘रिलायन्स’ने ११ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की हा करार पोस्ट मनी आधारावर ७० हजार ३५२ कोटी रुपयांमध्ये पूर्ण झाला आहे. विलीनीकरणानंतर स्थापन झालेल्या कंपनीमध्ये ‘रिलायन्स’चा ६३.१६ टक्के आणि ‘डिस्ने’चा ३६.८४ टक्के हिस्सा असेल. नीता अंबानी या कंपनीच्या अध्यक्ष असतील. कंपन्यांनी सांगितले की या संयुक्त उपक्रमाचे नेतृत्व तीन मुख्य कार्यकारी अधिकारी करतील. केविन वाझ मनोरंजन संस्थेचे प्रमुख असतील. किरण मणी डिजिटल संस्थेची जबाबदारी सांभाळतील, तर संजोग गुप्ता क्रीडा संघटनेचे नेतृत्व करणार आहेत.

‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले, ‘या संयुक्त उपक्रमामुळे भारतीय मीडिया आणि मनोरंजन उद्योग परिवर्तनाच्या युगात प्रवेश करत आहे. मी संयुक्त उपक्रमाच्या भविष्याबद्दल खूप उत्सुक आहे आणि प्रत्येक यशासाठी शुभेच्छा देतो.’ या मेगा विलीनीकरणामध्ये ‘डिस्ने स्टार’चे ८० आणि ‘रिलायन्स वायकॉम १८’चे ४० चॅनेल जोडले जातील. म्हणजेच एकूण १२० चॅनेल असतील. तथापि, यापैकी काही चॅनेल बंद केले जाऊ शकतात. ‘व्हायाकॉम १८’कडे ‘बीसीसीआय’ व्यवस्थापित क्रिकेट सामन्यांचे टीव्ही हक्क आहेत, तर डिस्ने स्टारकडे २०२७ पर्यंत आयपीएल प्रसारित करण्याचे टीव्ही अधिकार आहेत. रिलायन्सकडे जिओ सिनेमावर आयपीएल दाखवण्याचे अधिकार आहेत. रिलायन्सचे न्यूज चॅनेल या डीलचा भाग नसतील. रिलायन्स ही भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असून तिचे बाजारमूल्य १७,१५,४९८.९१ कोटी इतके आहे. रिलायन्स सध्या हायड्रोकार्बन शोध आणि उत्पादन, पेट्रोलियम शुद्धीकरण आणि विपणन, पेट्रोकेमिकल्स, प्रगत साहित्य आणि कंपोझिट,अक्षय ऊर्जा (सौर आणि हायड्रोजन), डिजिटल सेवा आणि किरकोळ क्षेत्रात कार्यरत आहे.

आता एक लक्षवेधी बातमी. महागाईने केवळ सर्वसामान्यांचेच नाही, तर श्रीमंतांचेही टेन्शन वाढवले आहे. महागाईचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. शेअर घसरल्याने मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचे सर्वाधिक नुकसान झाले. अंबानी यांची नेट वर्थ जवळपास दोन अब्ज डॉलरने कमी झाली तर अदानी यांच्या संपत्तीत जवळपास अडीच अब्ज डॉलरची घसरण दिसली. देशातील किरकोळ महागाई दर रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वर गेला आहे. हा दर ६.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. ‘ब्लूमबर्ग बिलिनियर इंडेक्स’नुसार, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत जवळपास दोन अब्ज डॉलरची घसरण आली आहे. अंबानी यांच्या नेट वर्थमध्ये १.८४ अब्ज डॉलरची घसरण दिसली. त्यांची एकूण संपत्ती आता ९४.४ अब्ज डॉलर इतकी आहे. या वर्षात त्यांच्या संपत्तीत १.९४ अब्ज डॉलरची घसरण दिसली. सध्या अंबानी जगातील सतरावे श्रीमंत उद्योगपती आहेत. आशियातील दुसरे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीतही घसरण पाहायला मिळाली आहे. ‘ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्स’मधील आकडेवारीनुसार अदानी यांच्या एकूण संपत्तीमध्ये २.४६ अब्ज डॉलरची घसरण दिसली. त्यांची संपत्ती ८६.८ अब्ज डॉलरवर आली आहे. या वर्षात अदानी यांच्या एकूण संपत्तीमध्ये २.५३ अब्ज डॉलरची भर पडली आहे. ते जगातील अठरावे श्रीमंत व्यापारी ठरले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये अदानी यांच्या संपत्तीमध्ये जवळपास चार अब्ज डॉलरची घसरण दिसली आहे. एका आठवड्यात अदानी यांच्या संपत्तीमध्ये जवळपास दहा अब्ज डॉलरची घसरण दिसली.

भारतासह अनेक देशांमध्ये ‘एआय’ झपाट्याने पसरत आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे येणाऱ्या काळात अनेक मोठे फायदे होणार आहेत तर काही तोटेदेखील आहेत. ‘सर्विसनाऊ इंडिया’च्या अहवालात ‘एआय’ बद्दल एक खास गोष्ट समोर आली आहे. या अहवालानुसार ‘एआय’ आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून २०२८ पर्यंत भारतात करोडो नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. ‘सर्व्हिसनाऊ इंडिया’च्या अहवालात सांगण्यात आले आहे की २०२८ पर्यंत भारतात नोकरदारांची संख्या सुमारे ४५.७२ कोटी होईल. २०२३ मध्ये ही संख्या ४२.३७ कोटी होती. याचा अर्थ येत्या पाच वर्षांमध्ये सुमारे ३.३८ कोटी लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. ‘सर्व्हिसनाऊ इंडिया’च्या अहवालानुसार येत्या काही वर्षांमध्ये भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रात सुमारे २७.३ लाख नोकऱ्या निर्माण होतील, असा अंदाज आहे. तंत्रज्ञान क्षेत्रानंतर उत्पादन क्षेत्रात जास्तीत जास्त नोकऱ्या वाढतील. यासोबतच शिक्षण आणि आरोग्य यासारख्या क्षेत्रातही रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. २०२६ पर्यंत सेमीकंडक्टर क्षेत्रात दहा लाख लोकांना नोकऱ्या मिळतील. ‘एआय’चा फायदा अनेक क्षेत्रांमध्ये होईल. ‘सर्व्हिसनाऊ इंडिया’च्या अहवालानुसार ‘एआय’च्या आगमनाने नोकऱ्यांमध्ये बदल होतील. सिस्टीम अभियंत्यांना जनरेटिव्ह ‘एआय’चा खूप फायदा होईल आणि त्यांचे अर्धे काम ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे हाताळले जाईल. ‘एआय’च्या आगमनाने, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि डेटा अभियांत्रिकी सारख्या क्षेत्रातील कौशल्यांमध्ये सुधारणा होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -