लासलगाव : किरकोळ बाजारात सध्या कांद्याचे दर स्थिर करण्याकरिता बफरस्टॉक मधील अधिक कांदा बाजारात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.यासाठी किरकोळ बाजारामध्ये दर स्थिर ठेवण्याकरिता तात्पुरता पुरवठा केला जाणार आहे.यामुळे कांद्याच्या दरावर केंद्र लक्ष ठेवून आहे.
केंद्राच्या प्राप्त माहितीनुसार, दिल्लीतील कांद्याचे किरकोळ विक्री दर ६५ रुपये प्रतिकिलो इतके असून देशभरात सरासरी ५८ रुपये इतका दर आहे.यामुळे सरकारने बफर स्टॉकमधील कांद्याचा पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेतला असून सणासुदीचा हंगाम व बाजार बंदी झाल्यामुळे काही बाजारांमधील कांद्याच्या पुरवठ्यात अडथळे येत होते. या पुरवठ्यामुळे ते अडथळे दूर होणार आहेत.
नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा दर स्थिर करण्यासाठी दिल्लीत दोन व गुवाहाटीत एक रेक पाठविण्याचे नियोजन करण्यात आले असून त्याप्रमाणे,बाजारात कांद्याची उपलब्धता होण्याकरिता रस्ते वाहतुकीद्वारे सुद्धा पुरवठा वाढण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्याचबरोबर ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून रस्ते व रेल्वे वाहतुकीद्वारे कांद्याचा पुरवठा केल्यामुळे उपलब्धतेत वाढ होईल असे म्हटले आहे. शिवाय सरकारने चंदीगढ़, पंजाब, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्लीसारख्या शहरांच्या गरजा पूर्ण करण्याकरिता सोनीपत येथे शीतगृहात ठेवलेला कांदा बाजारात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारने यंदा ४.७ लाख टन रब्बी कांदा खरेदी करून तो बफर स्टॉप केला आहे. ५ सप्टेंबर रोजी किरकोळ विक्रीद्वारे ३५ रुपये प्रतिकिलो दराने व देशभरातील प्रमुख मंडळींमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीद्वारे सुरुवात झाली होती. बफर स्टॉकमधील खरेदी केलेला दीड लाख टन अधिक कांदा नाशिक व इतर ठिकाणा वरून ट्रकद्वारे ग्राहक केंद्रांवर पाठवण्यात आला आहे.