Saturday, May 24, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Raj Thackeray on Sharad Pawar : शरद पवार महाराष्ट्राचे नेते कसे? हे तर तालुक्याचे नेते; राज ठाकरे यांची घणाघाती टीका

Raj Thackeray on Sharad Pawar : शरद पवार महाराष्ट्राचे नेते कसे? हे तर तालुक्याचे नेते; राज ठाकरे यांची घणाघाती टीका

लातूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत असून प्रचाराचा जोर वाढला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची लातूरच्या रेणापूरमध्ये सभा होत आहे. राज ठाकरे यांनी या सभेत बोलताना शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्याकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पाहिलं पाहिजे. शरद पवार ३ वेळा मुख्यमंत्री झाले. केंद्रात कृषी मंत्री झाले. एकदा बारामती तालुक्यात जाऊन पाहा. जेवढे उद्योग धंदे आले ते मराठवाड्यात आणता आले नसते. विदर्भात आणता आले नसते. इतक्या वेळा संधी मिळालेला माणूस फक्त आपल्या तालुक्यापुरता विचार करतो. हे असे लोक महाराष्ट्राचे नेते कसे होऊ शकतात. हे तर तालुक्याचे नेते…, असं म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.



निशाणा शरद पवारांवर


राष्ट्रवादीचा १९९९ साल जन्म झाला. तो जन्म झाल्यानंतर महान संत शरदचंद्रजी पवार यांना असं वाटलं आता धर्म आणि हिंदुत्वाच्या गोष्टी छाटायच्या कशा. लोकांना बाहेर कसं आणायचं. मग जातीचं राजकारण आणा. तेव्हापासून जातीचं राजकारण सुरू झालं. प्रत्येकाला जातीचा अभिमान असतो. जातीबद्दल प्रेम असणं वावगं नाही. मात्र दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष करणं हे चुकीचं आहे. या लोकांनी नेमक्या याच गोष्टी केल्या. तुमची माथी भडकावली. मूळ विषयाकडे आपण जायला तयार नाही. शेतकरी आत्महत्या करतो कुणाचं लक्ष नाही. रोज आत्महत्येचे आकडे वाढत आहे. कुणाचं लक्ष नाही. तरुण शेती सोडून शहरात जातो. कुणाचं लक्ष नाही. कृषी विद्यापीठ ओस पडले. त्याकडे कुणाचं लक्ष नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी तरूणांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं आहे.



भाष्य महिलांच्या सुरक्षेवर


राज्यात लहान मुलींवरील बलात्काराचं प्रमाण वाढलंय. तरुण मुली आणि महिलांना पळवून नेण्याचं प्रमाण वाढलं. असा नव्हता महाराष्ट्र. मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न आहे. विहिरीला पाणी लागत नाही. कुठून शेती करणार आहे. कोणत्याही गोष्टीकडे तुमचं लक्ष जाऊ नये म्हणून यासाठी म्हणून जातीपातीचा विषय तुमच्यासमोर आला. भांडा. बसा वाद घालत. बसा द्वेष पसरवत. त्यातून काही हाताला लागणार नाही. मूळ विषयाला लक्ष न दिल्याने त्यातून काही हाती लागणार नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी महिला सुरक्षेवर भाष्य केलं आहे.


मी तुम्हाला विश्वास देतो, या सर्व गोष्टी सहज शक्य आहे. नक्की होऊ शकतात. फक्त त्यासाठी इच्छा शक्ती हवी. ती माझ्याकडे आहे. तुडूंब भरलेली आहे. माझा प्रत्येक उमेदवार ही महाराष्ट्राची येणारी ताकद आहे. या राज्यात सत्ता आणायची असेल तर प्रत्येक माणूस महत्त्वाचा आहे. उमेदवार महत्त्वाचा आहे, असं राज ठाकरे भाषणात म्हणाले.

Comments
Add Comment