प्रकरण अंगलट येण्याची चिन्ह दिसताच अरविंद सावंतांना दिले माफी मागण्याचे आदेश
मुंबई : शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार अरविंद सावंतांच्या (MP Arvind Sawant) त्या वक्तव्याचे संजय राऊतांनी समर्थन केले. त्यानंतर राज्यभर त्यांच्यावर टीका झाली. यामुळे प्रकरण अंगलट येणार असे दिसताच ‘मातोश्री’वरुन सावंत यांना हे प्रकरण संपवण्याचा खास मेसेज आला. त्यानंतर शिवसेनेच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार शायना एनसी (Shaina NC) संदर्भात बोलताना ‘माल’ या शब्दाचा उल्लेख करण्यावरुन अडचणीत आलेले अरविंद सावंत यांनी तातडीने माध्यमांसमोर जाहीर दिलगिरी व्यक्त केली.
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या शायना एनसी यांनी तक्रार नोंदवल्यानंतर राज्याच्या कानाकोप-यातून उबाठा गटावर टीकेचा भडीमार करण्यात आला. त्याआधी कायम वादग्रस्त वक्तव्य करणारे संजय राऊत यांनी सावंतांचा समर्थन करण्याचा प्रयत्न केला. परंतू प्रकरण उद्धव ठाकरे यांच्या अंगलट येणार असे दिसताच ‘मातोश्री’वरुन सावंत यांना हे प्रकरण संपवण्याचा खास मेसेज आला होता. त्यानंतर अरविंद सावंत यांनी तातडीने माध्यमांसमोर दिलगिरी व्यक्त केली. परंतू ही दिलगिरी व्यक्त करत असताना त्यांनी महिलांविषयी झालेल्या वादग्रस्त वक्तव्यांची यादीच वाचून दाखवली.
शूर्पणखा कोण म्हणालं होतं, हे बघा, सोनिया गांधी यांच्याविषयी जर्सी गाय कोण म्हणालं होतं, हे आठवून बघा, किशोरी पेडणेकर यांचा उल्लेख जो आशिष शेलार यांनी केला, त्याच्याविषयी कुठली तक्रार झाली? एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या पदाधिका-याने बदलापूर प्रकरणी एका महिलेविषयी वक्तव्य केलं, त्यात कोणावर गुन्हे दाखल झाले? संजय राठोड यांच्यावर आरोप असताना तो तुमच्यासोबत आहे, राम कदम यांच्यावर काय कारवाई झाली, गुलाबराव पाटील हेमा मालिनी संदर्भात काय बोलले? अशी महिलांविषयक वादग्रस्त वक्तव्यांची यादीच अरविंद सावंत यांनी वाचून दाखवली.
कुठल्याही महिलेच्या भावना दुखवाव्यात किंवा कुठल्याही भगिनीचा अवमान करावा, असं मी आयुष्यात कधी केलं नाही. करत नाही, करणार नाही. पण भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत अरविंद सावंत ताडकन खुर्चीतून उठले.
‘त्यांची अवस्था पाहा. त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात गेल्या. पण, इथे इम्पोर्टेड चालत नाही. आमच्या इथे ओरिजनल माल चालतो,’ असे विधान अरविंद सावंत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे सर्वत्र पडसाद उमटले. त्यानंतर अरविंद सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.