पुणे: इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील आठवडे बाजारात कांद्याचे दर वाढल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे दिवाळीच्या तोंडावर किराणा मालासह खाद्यतेलाच्या दराने अचानक उसळी घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी कांद्याचे दर प्रतिकिलो १० ते १५ रुपये असे होते. त्यात नुकतीच वाढ होत प्रतिकिलो कांदा २५ ते ३० रुपये दराने विक्री होत आहे. परतीचा पाऊस व बदलत्या हवामानामुळे हळव्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तसेच शेतकर्यांनी साठवलेला जुना गावरान कांदा संपला असल्याने दराने उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकर्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. याशिवाय इतर भाजीपाल्याच्या किमतीतही वाढ झालेली आहे.