भाजपा वचननामा समितीची प्रदीर्घ बैठक संपन्न
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांकरता भाजपाचा वचननामा जनतेच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब असेल, असे प्रतिपादन सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी येथे केले. भाजपाच्या वचननामा समितीच्या प्रदीर्घ बैठकीनंतर ते बोलत होते.
भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला वचननामा समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने डॉ. विनय सहस्रबुद्धे, मंगलप्रभात लोढा, दिलीप कांबळे, मधु चव्हाण, ॲड.उज्ज्वल निकम, पाशा पटेल, राजेश पांडे, डॉ.भारती पवार, नीता केळकर, माधवी नाईक, सुरेश हावरे, लद्धाराम नागवानी, लक्ष्मण सावजी, स्मिता वाघ, अमोल जाधव, अनिल सोले, दयानंद तिवारी, कर्ण पातुरकर,मिलिंद तुळसकर आदी प्रमुख नेते सहभागी होते.
या बैठकीत उपस्थित नेत्यांनी वचननाम्यात समाविष्ट करण्याच्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा केली. आजवर मतदारांकडून व विविध विषयातील तज्ञांकडून प्राप्त झालेल्या सूचनांवरही सांगोपांग चर्चा झाली. भाजपाचा हा वचननामा सामाजिक जीवनाच्या सर्वच अंगांना स्पर्श करणारा, सर्व घटकांचे समाधान करणारा असा सर्वसमावेशक असावा यासाठी वचननामा समिती प्रयत्नशील आहे असेहीसुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
लोकनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रणित महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याची प्रत्येक नागरिकाला ही संधी असून नागरिकांकजून या वचननाम्यासाठी येणाऱ्या प्रत्येक सूचनेचे आम्ही स्वागत करीत आहोत, असेहीसुधीर मुनगंटीवार म्हणाले. आपल्या सूचना आपण [email protected] या ईमेल वर किंवा पत्राद्वारे अथवा ९००४६१७१५७ या व्हॉट्सअप वर लवकरात लवकर पाठवाव्यात अशी विनंती त्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या नागरिकांना केली आहे. तर भाजपा प्रदेश कार्यालयातही वचननाम्यासंदर्भात नागरिकांच्या सुचना स्वीकारण्याकरता एक पेटी ठेवण्यात आली आहे.