कुडाळ : बाजारात जाण्यावरून आई आणि मुलामध्ये झालेल्या वादात संतापाच्या भरात नराधन मुलाने आईचा गळा आवळून खून केला. ही दुर्दैवी घटना कुडाळ तालुक्यातील कसाल बौद्धवाडी येथे सोमवारी रात्री घडली.
याप्रकरणी सुरेंद्र मोहन कदम (वय ४०) याच्यावर स्वतःची आई मनोरमा मोहन कदम (वय ५८) हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले असल्याचे सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी सांगितले.
आईचा खून केल्यानंतर बॅग भरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
बाजारात जाण्यावरून झालेल्या वादातून त्याने आईला सुरुवातीला हाताने मारहाण केली. मात्र घरातून पळून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या आईला घराबाहेर पकडून दोरीच्या सहाय्याने गळा दाबून खून केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबत सिंधुदुर्ग नगरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
याबाबतची फिर्याद सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्याचे पोलीस शैलेश सोनसुरकर यांनी दिली. त्यानुसार संशयीत सुरेंद्र मोहन कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेली विहिरीचे पाणी काढण्यासाठी असलेली दोरी जप्त करण्यात आली आहे. १४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात ते आठच्या सुमारास ही घटना कसाल बौद्धवाडी येथील आंब्याचे झाडाखाली घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.