खास प्लॅनमध्ये ‘या’ ३० जागांवर देणार विशेष लक्ष
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देणार रणनीतीला अंतिम रुप
नवी दिल्ली : हरयाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने उभे केलेले मोठे आव्हान मोडून काढत विजय मिळवल्यानंतर भाजपाने (BJP Mission) आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर आपले लक्ष (Mission Maharashtra) केंद्रीत केले आहे. हरयाणामध्ये विजय निश्चित मानणाऱ्या काँग्रेसला निकालांमधून जबर धक्का बसला होता. महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत भाजपाने खास रणनीती आखली आहे. या रणनीतीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे स्वत: लक्ष ठेवून आहेत. या रणनीतीअंतर्गत पुणे, मुंबई व विदर्भावर खास लक्ष देण्यात येत आहे.
पुणे, मुंबई आणि विदर्भातील ३० हून अधिक जागांवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये तीव्र मतभेद आहेत. या ठिकाणी महायुतीकडून उमेदवारांची घोषणा सर्वात आधी करण्यात येणार आहे. येथे अधिक बलाढ्य उमेदवार उतरवण्याची अमित शहा यांची योजना आहे. त्यात मुंबईमधील ६, पुण्यातील ३ आणि विदर्भातील ५ जागांची समावेश आहे. मुंबईतील अल्पसंख्याक समाजाचा वरचष्मा असलेल्या ६ जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गट या दोघांकडूनही दावेदारी केली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरून तिढा निर्माण झाला आहे. त्याचा फायदा उचलण्यासाठी महायुतीकडून रणनीती आखली जात आहे.
बंडखोरांची समजूत काढण्यासाठी खास रणनीती
हरयाणामधील निकालांनंतर महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराबाबत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून फिडबॅक घेण्यात येत आहे. महायुतीमधून या ठिकाणी बंडखोरी होऊ नये यासाठी ज्येष्ठ नेत्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मराठा समाज व ओबीसींमध्ये सामंजस्य निर्माण करण्यासाठी, बंडखोर उमेदवारांची समजूत घालण्यासाठी खास रणनीती आखण्यात येत आहे.
नॉन क्रिमी लेअरची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्राकडे रवाना
महायुतीच्या जागावाटपामध्ये ओबीसी आणि मराठा समाजादरम्यान ताळमेळ बसवला जाईल. दोन्ही समाजातील लोकांना समान प्रमाणात तिकीटे दिली जातील. तिकीट वाटपाच्या फॉर्म्युल्याला जवळपास अंतिम रूप दिले गेले आहे. स्वत: अमित शहा हे याबाबतच्या रणनीतीला अंतिम रूप देत आहेत. एवढेच नाही तर ओबीसींसाठीची नॉन क्रिमी लेअरची मर्यादा वाढवण्याचा निर्णयही राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. तसा प्रस्तावर राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.