
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा (Ratan Tata) यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना सोमवारी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान बुधवारी रात्री उशीरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तीन दिवसांपूर्वीही रतन टाटा यांनी स्वत: सोशल मीडियावर एक निवेदन जारी करत यासंदर्भात खुलासा केला होता. ही बातमी अफवा असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटलं होतं. माझ्या वयामुळे आणि वैद्यकीय कारणांमुळे सध्या माझी वैद्यकीय तपासणी सुरु आहे, असेही त्यांनी सांगितलं होतं.
२८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत जन्मलेले रतन टाटा उद्योगांसह सामाजिक क्षेत्रातही काम करत आहेत. रतन टाटा हे टाटा समुहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू आहेत. परदेशात शिक्षण पूर्ण केल्यानंतर रतन टाटा प्रथम टाटा ग्रुपची कंपनी टाटा इंडस्ट्रीजमध्ये सहाय्यक म्हणून रुजू झाले. १९९० ते २०१२ पर्यंत २२ वर्षे ते टाटा समुहाचे अध्यक्ष होते. तसेच ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान, त्यांनी टाटा समुहाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कारभार पाहिला आहे. रतन टाटा यांनी अनेक वर्षे टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून कामकाज पाहिलं आहे.
एक यशस्वी उद्योगपती असण्याबरोबरच ते त्यांच्या परोपकार अन् दानधर्मासाठीही ओळखले जातात. रतन टाटा यांचा जन्म १९३७ मध्ये मुंबईत नवल टाटा आणि सुनी टाटा यांच्या पोटी झाला. रतन टाटा १० वर्षांचे असताना त्यांचे पालक विभक्त झाले, त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आजी नवाजबाई टाटा यांनी केले. रतन टाटा यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतून घेतले. यानंतर त्यांनी बिशप कॉटन स्कूल, शिमला आणि रिव्हरडेल कंट्री स्कूल, न्यूयॉर्कमधून १९५५ मध्ये डिप्लोमा केला. रतन टाटा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी कधीही लग्न केले नाही.
केवळ उद्योगच नव्हे तर रतन टाटा हे त्यांच्या परोपकारी कार्यासाठीही जगभर प्रसिद्ध आहेत. रतन टाटा यांनी भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठाला एकूण २८ दशलक्ष डॉलर्स दान केले. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय भारतीय विद्यार्थ्यांना मदत होते. याबरोबरच हार्वर्ड बिझनेस स्कूलने विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ५० दशलक्ष डॉलर्स दान केले होते. याशिवाय त्यांनी २०१४ मध्ये आयआयटी बॉम्बेमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी ९५ कोटी रुपयांची देणगी दिली होती. याबरोबरच दरवर्षी ते आपल्या कमाईतील मोठा हिस्सा धर्मादाय कार्यात खर्च करतात.