एमआयजी क्लबचे चेअरमन मोहन नागपूरकर व जनरल सेक्रेटरी श्रीकांत शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई : दैनिक प्रहार (Prahaar) मुंबई आवृत्तीचा १६ वा वर्धापन दिन आज प्रहार कार्यालयात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास वांद्रे येथील प्रसिध्द अशा एमआयजी क्लबचे चेअरमन मोहन नागपूरकर व जनरल सेक्रेटरी श्रीकांत शेट्टी दैनिक प्रहारच्या चमूला शुभेच्छा देण्यासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. महाव्यवस्थापक व राणे प्रकाशनचे मुद्रक-प्रकाशक मनीष राणे, एच.आर.लेखा प्रशासक, वितरण विभागाचे प्रमुख ज्ञानेश सावंत. संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला दैनिक प्रहार समूहाचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
दैनिक प्रहारच्या मुंबई आवृत्तीचा १६ वा वर्धापन दिन आज दैनिक प्रहारच्या मुंबई कार्यालयात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोहन नागपूरकर यांनी दैनिक प्रहारच्या वाटचालीस शुभेच्छा देताना माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत आलेले त्यांचे अनुभव कथन केले. तसेच नारायण राणे यांनी शून्यातून विश्व निर्माण करण्याच्या त्यांच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक केले. माणूस आपली प्रगती कशा प्रकारे साध्य करू शकतो, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे नारायण राणे असे सांगत प्रत्येकाने त्यांच्याकडून बरेच काही शिकून आपली प्रगती कशी करता येईल, हे पाहावे असे सांगत मार्गदर्शन केले.
आजच्या पत्रकारितेबद्दल बोलताना ते म्हणाले की, आजची पत्रकारिता सोपी नाही. पत्रकारांना कुठे कधीही जावे लागते. त्यात बऱ्याचदा त्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो. त्यात रोज नवनवीन तंत्रज्ञान येत असून, ते शिकून घेणे गरजेचे असून कोणतेही कामे टीमवर्कनेच होते. तसेच कोणतेही काम कमीपणाचे नसून दिलेले काम कसे अचूक करता येईल, हे पहावे व यशस्वी व्हावे असेही ते म्हणाले.
तर एमआयजी क्लबचे जनरल सेक्रेटरी श्रीकांत शेट्टी यांनी एमआयजी क्लब मधील विविध उपक्रमांची माहिती विशद केली. तसेच खेळाडूंपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत व राजकारण्यांपासून त्यांच्या हौशी कार्यकर्त्यांकडून आलेले विविध अनुभव कथन केले.
महाव्यवस्थापक व राणे प्रकाशनचे मुद्रक प्रकाशक मनीष राणे यांनी पाहुण्यांचे प्रहार समुहातर्फे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. दैनिक प्रहारच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. तर प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. एच आर, लेखा, प्रशासन व वितरण विभागाचे प्रमुख ज्ञानेश सावंत यांनी आभार मानले.
पालकांनी मुलांना आनंदी कसे जगावे याचे मार्गदर्शन करावे!
हल्ली पालक आपल्या मुलांना डॉक्टर हो, इंजिनियर हो, संगणक तंत्रज्ञ हो, क्रिकेटर हो, असा तगादा लावतात; मात्र जीवनात काहीही कर व आनंदी हो,असे आज सांगण्याची गरज असल्याचे मोहन नागपूरकर यांनी सांगितले. जीवनात आनंदी राहणे हे महत्त्वाचे असून, आपण करत असलेल्या कोणत्याही कामात आनंदी राहणे खूप महत्त्वाचे असून, असा विचार करणारे पालक निर्माण होण्याची गरज आहे असे त्यांनी नमूद केले.