Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Mumbai Goa Highway : पाबळ खोरे संघर्ष समितीच्या माध्यमातून मंगळवारी रास्ता रोको!

Mumbai Goa Highway : पाबळ खोरे संघर्ष समितीच्या माध्यमातून मंगळवारी रास्ता रोको!

उड्डाणपुलाच्या गाळ्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक होणार ठप्प


अलिबाग : मुंबई-गोवा (Mumbai Goa Highway) राष्ट्रीय महामार्गावरील पेण तालुक्यातील कोलेटी गावाजवळ उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचा गाळा कमी रुंदीचा ठेवल्याने त्यातून पाबळ भागात जाणारी एसटी सेवा बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याविरोधात पाबळ खोरे संघर्ष समितीच्या माध्यमातून ८ ऑक्टोबरला रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती पाबळ खोरे संघर्ष समितीचे अध्यक्ष अरुण शिवकर यांनी दिली. परिणामी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प होणार आहे.


मुंबई-गोवा महामार्गावरील कोलेटी येथे असणारा कमी उंचीचा अरुंद असणाऱ्या पुलाची तक्रार येथील ग्रामस्थांनी अनेकवेळा केली आहे. यासंदर्भात २० दिवसांपूर्वी खासदार सुनील तटकरे यांच्या सोबत संबंधित अधिकाऱ्यांचा दौराही झाला. त्यावेळी लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन खासदार तटकरे यांनी पुलाची उंची व रुंदी याबाबत फेरविचार करण्याच्या सुचना देऊनही या रस्त्याचे व पुलाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी हेतूपुरस्सर हे काम चालू ठेवल्याचा आरोप या निमीत्ताने ग्रामस्थांनी केला आहे.


महामार्ग विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या पुलाची उंची कमी करून त्याचा पाया कमी केल्याने दर पावसाळ्यात या गाळ्यात पुराचे पाणी शिरणार आहे. दर पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नागोठण्यानंतर अंबा नदीचे पाणी या गावात शिरते. याची पूर्वकल्पना येथील ज्येष्ठ शेतकऱ्यांनी देऊनही अधिकाऱ्यांनी येथील भौगोलिक परिस्थितीचा कोणताही विचार न करता, आपली मनमानी सुरु ठेवली असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

Comments
Add Comment