प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ
काल आईचे आयुर्वेदिक औषध आणायचे म्हणून आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात गेले होते, तसे आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात जाण्याचा कधी प्रसंग आलेला नव्हता. त्याच्या काऊंटरवर समोरच नक्षीकार उतरत्या फळीवर अतिशय उत्तमरीत्या साधारण पंचवीस प्रकारचे वेगवेगळे साबण रचून ठेवले होते. समोर लक्ष गेले आणि लक्ष ठरनूच राहिले. वेगवेगळे आकार, वेगवेगळे रंग आणि मुख्य म्हणजे त्या भागातून येणारा एक विशिष्ट मनमोहक सुगंध. आईच्या औषधाचे नाव दुकानदाराला सांगितले आणि तो शोधण्यासाठी दुकानाच्या बाजूच्या पायऱ्या चढून वर गेला. किती तरी वेळाने एक बाटली घेऊन खाली आला. मी आईला फोन करून सांगितले की, अशी बाटली आहे. तर आई म्हणाली की, लाल रंगाची नाही, निळ्या रंगाची आहे. मी वर्षानुवर्ष ती निळ्या रंगाची बाटली वापरते. मी त्यांना विचारले की, निळ्या रंगाची बाटली आहे का? तर ते म्हणाले की होय, आहे की, त्याच्यामध्ये हे… द्रव्य आहे. ठीक आहे मी ते घेऊन येतो.
आता तो दुसऱ्यांदा वर गेल्यावर मी काही साबण हातात घेतले आणि त्याच्यावर हे साबण बनवण्यासाठी कोणती सामग्री वापरली ते वाचू लागले. मला असे लक्षात आले की, विक्रेत्याला तेच हवे होते. लगेच त्याने त्याच्याविषयी अधिकची माहिती द्यायला सुरुवात केली. ‘या साबणामध्ये तुळशीची पानेे टाकलेली आहेत तर यात आपण साबणामध्ये तुळशी आणि एलोवेरा एकत्र आहे तर या साबणामध्ये फक्त एलोवेरा आहे.’ अशा तऱ्हेने चंदन, रक्तचंदन, कडुलिंब, ग्लिसरीन अशा आणखी कितीतरी प्रकारच्या आयुर्वेदिक पदार्थांपासून बनवलेले साबणांचे त्यांनी मला गुणविशेष सांगायला सुरुवात केली. स्वाभाविकपणे चक्क एक नाही तर मी तीन साबणांची खरेदी केली. घरी आल्यावर आपण हातपाय धुतो तेव्हा त्यातला पहिला साबण चेहऱ्यालाही लावला आणि आरशात पाहिले. माझा चेहरा नेहमीपेक्षा थोडासा उजळल्यासारखा मला वाटला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर हलकीशी चमकही दिसून आली. खूपच आनंद झाला. मी काही कोणत्या साबणाची जाहिरात करत नाहीये पण गंमत म्हणून सांगते की, कोणत्याही वस्तूमध्ये आपण बदल केला की उगाचच आपल्याला आतून बरे वाटू लागते आणि आपल्याला आतून बरे वाटले की सगळं बाहेरचे जगसुद्धा छान छान वाटू लागते. म्हणूनच आपण जुने कपडे फाटले नाही तरी नवीन कपडे घेतो. नवीन कपडे घातले की, आपल्याला खूप छान वाटते. आपण उगाचच त्या कपड्यांमध्ये चांगले दिसतो, असे वाटते. ते कपडे घातल्यावर आपल्याला, आपले मित्र-मैत्रिणी किंवा घरातली ‘अरे वा छान आहे की!’ असे म्हणतात त्यामुळे मला आपल्याला आणखी छान वाटते.
कोणाच्याही घरी जेवायला गेल्यावर आपल्याला साधा भातसुद्धा खूप आवडतो. बाकीच्या पदार्थांविषयी तर मी बोलतच नाहीत याचे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये आणायचा तांदूळ ठरलेला असतो. आम्ही फक्त बासमतीच खातो, आम्ही फक्त आंबेमोहरच खातो… आणखी काही. त्यामुळे तो विशिष्ट तांदूळ आपल्या घराजवळच्या विशिष्ट दुकानातून आपण आणतो. तो दुकानदार एका विशिष्ट मोठ्या दुकानातून तो तांदूळ खरेदी करतो आणि त्या मोठ्या दुकानात कोणत्या तरी एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातून आलेला तो तांदूळ असतो. याचा अर्थ असा की, वर्षानुवर्ष त्या तांदळात फारसा फरक पडलेला नसतो. तो खाऊन खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो पण आपण तरीही तो तांदूळ बदलत नाही. मग दुसऱ्यांच्या घरी जेव्हा आपण जिरे-साळ किंवा कोलम खातो किंवा साधा रेशनचा तांदूळ खातो, तोसुद्धा आपल्याला खूप आवडून जातो कारण ‘बदल.’ हा चवीत झालेला बदल आपल्याला हवाहवासा वाटतो.
आपण कोणाच्या तरी आग्रहास्तव किंवा कुठे तरी गेल्यावर सहज जिममध्ये जातो आणि आल्यावर त्या दिवशी आपल्याला खूप छान वाटते. तसे आपण नेहमी चालण्याचा व्यायाम करत असतो पण जिममध्ये कदाचित थोड्याफार वेगळ्या प्रकारे शारीरिक हालचाल होते आणि ती आपल्याला आनंद देऊन जाते इतकेच.
या सर्वांचा अर्थ मी माझ्या दृष्टीने एवढाच घेते की, माणसाने अधूनमधून आपण वापरत असलेली तेल, साबण, फेस पॅक, मॉइश्चरायझर, पावडर बदलत राहिले पाहिजे. खाण्याच्या पदार्थांचा विचार करता वेगवेगळ्या दुकानातून वेगवेगळ्या प्रकारचे गहू, तांदूळ, ज्वारी, डाळी आणून खाल्ले पाहिजेत. त्याचप्रमाणे रोज न चुकता चालण्याचा व्यायाम करत असाल, तर कधीतरी एक दिवस शांतपणे योग किंवा पोहण्याचा व्यायाम केला तर खूप छान वाटते. या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सहज बदल करू शकतो; परंतु आपल्या स्वभावाचे काय? त्याच्यात कधीही बदल करण्याचा आपण विचार केला आहे का? नाही ना? मग तोही करून पाहूया ना; म्हणजे मला टीव्हीवर बातम्या सोडून काहीही पाहायला आवडत नाही हा हेका सोडून कधीतरी नॅशनल जिओग्राफिक हे चॅनल लावून निसर्ग, प्राणी, वाहते पाणी पाहून किती छान वाटते ते पाहा. हो आणि मला माणसांमध्ये मिसळायला आवडत नाही. मी कधीच जात नाही सणसमारंभाला, अशा म्हणणाऱ्या माणसांनी, कोणी आपल्याला बोलवले तर जरूर तिथे जाऊन पाहावे. तो आनंद पडताळून पाहावा.
बदलाशिवाय प्रगती अशक्य आहे. त्यामुळे प्रगतीसाठी जे काही चांगले आहे, ते बदलून बघा. मूळतः दुसऱ्यांना बदलण्यापेक्षा आपल्या स्वतःला बदलून बघा.
pratibha.saraph@ gmail.com