क्राइम- ॲड रिया करंजकर
आपली केस लढण्यासाठी न्यायालयात वकीलच लागतो. त्याशिवाय केस लढली जाऊ शकत नाही. आपली बाजू व्यवस्थित न्यायालयात मांडण्याचे काम वकील मंडळी करत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस या न्यायालयात फाईल केल्या जातात आणि त्याप्रमाणे प्रत्येक केसेसला त्यात विद्वान असणारे वकील या केस लढत असतात. स्त्रियांच्या बाबतीत डी वी मॅटर, मेंटेनन्स, घटस्फोट अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारे केसेस स्त्रिया न्यायालयात दाखल करू शकतात. मग त्या आपल्या कुटुंबाच्या विरुद्ध किंवा नवऱ्याच्या विरुद्ध असूदेत.
अशीच घटस्फोटाची केस सरिताने आपल्या पतीविरुद्ध न्यायालयात दाखल केली होती. ती केस लढण्यासाठी एका वकिलाला तिने अपॉइंट केलेले होते. प्रत्येक वकिलाचे स्वतःचे असे ऑफिस असते किंवा ज्युनिअर वकील असेल तर आपल्या सीनियर वकिलांचा ऑफिस सांभाळत असतो. पण या ठिकाणी असे झाले की, केस संदर्भात चर्चा करण्यासाठी सरिताने आपल्या वकिलाला आपल्या गावी बोलवले होते. वकिलालाही वाटले काहीतरी महत्त्वाचे असेल म्हणून तो कसलाही विचार न करता सरिताच्या गावी जायला निघाला. प्रत्येक वकिलाला असे वाटत असते की, आपण जिंकावे म्हणून त्यासाठी तो अनेक प्रकारचे पुरावे गोळा करत असतो. तसेच या वकिलाचे झाले असणार आणि तो सरिताच्या गावी गेल्यावर सरिताचा अगोदरच तिथे मित्र येऊन थांबलेला होता. त्याने वकिलाला चाकूचा धाक दाखवून एका खोलीत नेले आणि चाकूच्या भीतीने सरितासोबत अश्लील फोटो काढले. याविषयी कुठेही तक्रार केली, तर जीवे मारून टाकू अशी धमकी त्या वकिलाला दिली. दोन तास होतात न होता तोपर्यंत सरिताने वकिलाकडे तीन लाखांची मागणी केली. नाही तर फोटो आणि व्हीडिओ व्हायरल करेन अशी धमकी दिली. स्वतःच्या प्रतिष्ठेला जपण्यासाठी वकिलाने तीन लाख दिले. दोन दिवसांनी पुन्हा सरिताने धमकी वजा वकिलाला फोन केला. त्यावेळी मित्रांकडून परत तीन लाख जमा करून सरिताला दिले. चार दिवसांनी परत दोन लाखांसाठी सरिताचा फोन आल्यावर वकिलाने तिला पैसे देण्याचा फोन घ्यायला टाळाटाळ सुरू केली.
सरिताचा पैशांसाठी सतत फोन येऊ लागला हे वकिलाला कळून चुकले होते की, ती फोटो व्हायरल करणार नाही कारण तिला पैशांची गरज होती. जर फोटो व्हायरल केले असते, तर तिला पैसे मिळणार नव्हते या गोष्टीची जाणीव वकिलाला उशिरा झाली. वकिलाने सरिताची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली असता पोलिसांनी एफआयआर दाखल केले होते. न्यायालयाच्या वकिलाला धमकी देऊन ब्लॅकमेल केले जात होते. ते पण जबरदस्तीने. या सर्व घटनेचा व्यवस्थित तपास केल्यानंतर पोलिसांनी सरिता आणि तिच्या मित्राला गावातून अटक करून त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. वकिलाने आपल्या ऑफिसमध्ये सरिताला बोलवायला पाहिजे होते पण गावात काहीतरी पुरावे हाती लागतील, महत्त्वाची माहिती मिळेल यामुळे सरितावर विश्वास ठेवून गावी गेला होता. तिथेच तो वकील फसला. कायद्यामध्ये विद्वान असलेल्या वकिलांना पण आता क्रिमिनल माइंड असलेले लोक फसवायला निघाले आहेत.
(सत्यघटनेवर आधारित)