सप्टेंबरमध्ये आढळले १२६१मलेरियाचे तर १४५६ डेंग्यूचे रुग्ण
मुंबई : वाढत्या मच्छरांच्या प्रादुर्भावामुळे मुंबईकर आजारी पडत असल्याचे चित्र शहरातील रुग्णालयामधील गर्दीवरुन पाहिल्यानंतर लक्षात येते. पावसाळ्यातील शेवटच्या महिन्यात मुंबईत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यातच, मुंबई शहर व उपनगरामध्ये सप्टेंबर महिन्यात मलेरीया आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यात मुंबईत मलेरियाच्या १२६१ केसेसची नोंद तर डेंग्यूच्या १४५६ केसेसची नोंद करण्यात आली आहे.
पावसाचा जोर ओसरला तरी पावसाळी आजारांची संख्या काही कमी झालेली नाही. शहरात मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. हे दोन्ही आजार डासांमुळे होतात. त्यामुळे, घर व परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा करणे आणि डासांचा प्रादुर्भाव कमी होईल, यासाठी जागरुक असणे गरजेचे आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेकडून भाग मच्छर भाग ही विशेष जनजागृती मोहिम राबवली जात आहे. डेंग्यू आणि मलेरिया या आजारांमध्ये थंडीताप, सर्दी, खोकला आणि सांधेदुखी ही सर्वसामान्य लक्षणे दिसतात. मात्र काही रुग्णांमध्ये हीच लक्षणे असली तरी वैद्यकीय चाचणीमध्ये कोणत्याही आजाराचे निदान होत नसल्याने नागरिक कमालीचे अस्वस्थ होत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मतानुसार व्हायरल (विषाणूंचा) संसर्ग असल्याचे सांगितले जात आहे.
अंगदुखीमुळे बाधित रुग्ण हैराण
अंगदुखीमुळे बेजार काही रुग्णांमध्ये थंडी, ताप, खोकला, सर्दी अशी सर्वसामान्य लक्षणे दिसून येतात. मात्र, दोन ते तीन दिवसांनी रक्तचाचणी केल्यानंतर कुठल्याही आजाराचे निदान होत नाही. डॉक्टर व्हायरलची साथ असल्याचे सांगून लक्षणानुसार उपचार करत आहेत. विशेष म्हणजे, तीन-चार दिवसांत हा आजार बरा होत असला तरी अंगदुखीमुळे मात्र बाधित रुग्ण हैराण होत असल्याचे चित्र आहे.
झिका व्हायरसचा आढळला एक रुग्ण
मुंबईत झिका व्हायरसच्या एका रुग्णाची नोंद झाली असून ६३ वर्षीय महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाची तब्येत स्थिर असून आता कोणतीही लक्षणे नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले. तसेच, झिका आजारामुळे मृत्यूचे प्रमाण नगण्य असल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. झिकामध्ये ताप येणे, पुरळ, डोळे दुखणे, अंग दुखी, सांधे दुखी, थकवा आणि डोकेदुखीसारखी लक्षणे आढळून येतात.
‘ऑक्टोबर हिट’चा मुंबईकरांना पहिल्याच दिवशी फटका; पारा ३३.५ अंशावर
‘ऑक्टोबर हिट’चा मुंबईकरांना फटका बसला असून, पहिल्याच दिवशी पारा ३३.५ अंशावर पोहोचला होता. परतीचा पाऊस अद्याप गुजरात, राजस्थानमध्ये आहे, मात्र मुंबईला मात्र पहिल्याच दिवशी ऑक्टोबर हीटने बेजार केले आहे. १ ऑक्टोबर रोजी मुंबईचे कमाल तापमान ३३.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले होते. दरम्यान, हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी सांगितले की, बुधवारी तापमान किंचित कमी होईल किंवा हीट कमी होते. तर शनिवार व रविवारपर्यंत मुंबईकरांना तापमान जास्त जाणवेल. त्यानंतर मात्र परतीच्या पावसाची शक्यता आहे. निरभ्र आकाशामुळे रात्रीतून उष्णतेचे पूर्णपणे उत्सर्जन होत नाही. दिवसागणिक उष्णतेची वाढ होऊन आर्द्रता वाढते. त्यामुळे घाम निघतो. परिणामी, मानवी जिवाची काहिली वाढवते. हा संपूर्ण महिना उष्णतेने होरपळवतो. मुंबईत तर ही स्थिती अधिक तीव्र असते. कारण मुंबई असे बेट आहे की सर्वसाधारण समुद्र सपाटीपेक्षा खोली अधिक असल्यामुळे हवेच्या उच्च दाबाच्या उंची अधिक असते. त्यामुळे उष्णतेचा परिणाम अधिक जाणवतो. दरम्यान, मुलुंड -३७, घाटकोपर-३७, बोरीवली- ३५.५, ठाणे-३५.५, भायखळा- ३५,अंधेरी- ३३, कुलाबा- ३२.८ तापमान अंश सेल्सिअसमध्ये होते.