Wednesday, March 26, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेआनंद दिघेंप्रमाणेच एकनाथ शिंदेंना संपवण्याचा रचला होता कट

आनंद दिघेंप्रमाणेच एकनाथ शिंदेंना संपवण्याचा रचला होता कट

सिडको महामंडळाचे अध्यक्ष आमदार संजय शिरसाट यांचा खळबळजनक दावा

छत्रपती संभाजीनगर : विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात देखील आनंद दिघे (Anand Dighe) यांच्यासारखा कट रचला गेला होता, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे नेते आणि सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे.

त्यांनी पुढे म्हटले की महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात नक्षलवाद्यांच्या माध्यमातून शिंदे यांना धमक्या दिल्या जात होत्या आणि त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली जावी, अशी पोलिसांची शिफारस असूनही त्यावर सही करण्यात आली नाही.

शिरसाट यांच्या मते, शिंदे यांना मारण्याचा कट रचला गेला होता आणि या कटाचे नेतृत्व त्या काळातील काही वरिष्ठ नेत्यांनी केले होते. शिवसेनेतील काही नेत्यांना एकनाथ शिंदे यांची वाढती ताकद अस्वस्थ करीत होती. त्यामुळे त्यांचा राजकीय प्रभाव कमी करण्यासाठी हा कट आखला गेला असावा, असा शिरसाट यांचा आरोप आहे.

त्याचप्रमाणे शिरसाट यांनी आणखी एक गंभीर दावा केला की, शिवसेना नेते आनंद दिघे यांची हत्या झाली होती, तो केवळ अपघात नव्हता. ठाण्यातील लोकांना याची कल्पना होती, परंतु दिघे यांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांना हटवले गेले. दिघे यांचा हृदयविकाराने मृत्यू होणे संशयास्पद होते, कारण त्यांची तब्येत त्या काळात चांगली होती.

या पार्श्वभूमीवर, शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीही शिरसाट यांचे समर्थन केले. त्यांनी आरोप केला की, उद्धव ठाकरे यांनी दिघे यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा मागितला होता. कारण त्यांना आपल्या प्रभावाला धोका वाटत होता. आनंद दिघेंच्या मृत्यूचे राजकारण होऊ नये, असेही कदम यांनी स्पष्ट केले.

या आरोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, यामुळे शिवसेना-शिंदे गटातील तणाव अधिक तीव्र झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -