Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीदिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी रिकामी खुर्ची बाजुला ठेवून स्वीकारला पदभार; कारण देत...

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी रिकामी खुर्ची बाजुला ठेवून स्वीकारला पदभार; कारण देत म्हणाल्या..

नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी आम आदमी पक्षाने आतिशी मार्लेना यांची अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर एकमुखाने निवड केली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्रीपदाचा पदभार आतिशी यांनी स्वीकारला. दरम्यान, आतिशी यांच्या बाजुला पदभार स्वीकारताना एक रिकामी खुर्ची ठेवण्यात आली. त्यामुळे त्यांच्या या कृतीची आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी माध्यमांशी बोलताना यामागचं कारणही सांगितलं आहे.

आतिशी मार्लेना यासंदर्भात मीडियाशी बोलताना म्हणाल्या, ज्याच्याप्रमाणे महाभारतात भरत यांनी प्रभू श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेऊन १४ वर्ष राज्य केलं, त्याचप्रमाणे मीसुद्धा पुढचे चार-पाच महिने सरकार चालवणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या सन्मानार्थ मी हा निर्णय घेतला आहे. पुढे बोलताना म्हणाल्या आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पुन्हा विजय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मी केवळ आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री असणार आहे. दिल्लीतील जनता या निवडणुकीत पुन्हा आम आदमी पक्षाला बहुमताने निवडून देईल आणि अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, असं त्या म्हणाल्या.

भाजपाकडून टीका

दरम्यान, भाजपाने आम आदमी पक्षावर आतिशी यांच्या या निर्णयानंतर जोरदार टीका केलीये. यावरून दिल्लीचे सरकार आतिशी नाही, तर आता अरविंद केजरीवाल रिमोट कंट्रोलद्वारे चालवणार, हे सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री पदाचा हा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया दिल्ली भाजपाच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -