Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीOne Nation One Election : 'एक देश एक निवडणूक' प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेट...

One Nation One Election : ‘एक देश एक निवडणूक’ प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मंजूर

नवी दिल्ली : ‘एक देश एक निवडणूक’ (One Nation One Election) हा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये मंजूर झाला आहे. यासंबंधीचा कायदा पारित करण्यापूर्वी केंद्र सरकारने (Modi Government) देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालाला केंद्रीय कॅबिनेटने बुधवारी मंजुरी दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारीच याबबात विधान केले होते. बुधवारी हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यामुळे हा कायदा कधीपासून लागू होईल, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

२०१९ मध्ये देशात दुसऱ्यांदा भाजपची सत्ता आल्यानंतर एक देश एक निवडणूक यावर चर्चा करण्यासाठी देशातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना भाजपाने बोलावले होते. यावेळी काँग्रेस, तृणमूल, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी आणि द्रविड मुन्नेत्र कझघम या पक्षांनी जाणं टाळलं होतं. तर आम आदमी पार्टी, तेलगु देसम पक्ष, भारत राष्ट्र समिती या पक्षांनी बैठकीला हजेरी लावली होती.

या अहवालामध्ये कोविंद समितीकडून दोन ते तीन शिफारशी केल्याचे समजते. एक देश एक निवडणुकीसाठी कायद्यात सुधारणा आणि घटनादुरुस्ती करण्याची गरज पडू शकते. याविषययी अहवालामध्ये मुद्दे मांडण्यात आल्याची माहिती आहे.

‘एक देश, एक निवडणूक’ याचा सरळ अर्थ देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळेस घेणे असा आहे. नागरिकांना या दोन्ही निवडणुकांसाठी एकाच वेळी मतदान करता येईल. सध्या देशात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या वेळी दर पाच वर्षांनी घेतल्या जातात.

‘एक देश, एक निवडणूक’ साठी आतापर्यंत तीन समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली चौथी समिती आहे.

‘वन नेशन- वन इलेक्शन’ची संभाव्यता पडताळून पाहण्याची जबाबदारी केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर सोपविली होती. कोविंद यांनी याआधीही अनेकदा या संकल्पनेचा पुनरुच्चार केला होता. संसदेच्या संयुक्त अधिवेशनात २९ जानेवारी २०१८ रोजी बोलताना कोविंद यांनी सातत्याने सुरू असलेल्या निवडणुकीबाबत चिंता व्यक्त केली होती. याचा अर्थव्यवस्था आणि विकासावर देखील विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. २३ जुलै २०२२ रोजी कोविंद हे राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाले होते. यावेळी सर्वपक्षीयांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनावेळी त्यांनी याबाबत आवाहन केले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -