दीपक केसरकर यांनी सांगितला आराखडा
मुंबई : सध्या अनेक पालक त्यांच्या मुलांना सीबीएससी बोर्डाच्या (CBSC Education) शाळांमध्ये शिक्षण देत आहेत. शिक्षणाकडे राज्यातील पालकांचा ओढा वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम सरकारी शाळांवर पडत असल्याचे दिसून येत आहे. सीबीएससी बोर्डातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश मोठ्या प्रमाणात होत आहे. या कारणांमुळे सरकारी शाळाना ओस पडत असल्याने ही बाब लक्षात घेता राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार आता महाराष्ट्रातील शाळांच्या अभ्यासक्रमात नवा पॅटर्न लागणार असून राज्यातील विद्यार्थ्यांना याचा चांगलाच शैक्षणिक फायदा होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीएससी बोर्डाच्या शाळांकडे मुलांचा वाढता कल पाहता, तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये राज्य शिक्षण मंडळाची मुले मागे पडू नयेत, यासाठी शिक्षण विभागाने राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएससी अभ्यास पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे आता राज्य शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांना सीबीएससी बोर्डा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. त्यासाठी तिसरी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रमही निश्चित करण्यात आला आहे. तो पुढील शैक्षणिक वर्षापासून शिकवला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
काय म्हणाले दीपक केसरकर?
एका पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळवण्याबद्दल एक आराखडा तयार केला असल्याचे म्हटले आहे. सीबीएससी शाळांचे वेळापत्रक आणि सुट्ट्या वेगळ्या असतात. त्यामुळे आता त्या शाळाप्रमाणे बदल करण्यासाठी शिक्षक संघटनांची चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान, सीबीएससी पॅटर्न असला तरीही अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय अनिवार्य करण्यात येणार आहे. तसेच याआधी अकरावी बारावीला मराठी या विषयाला पर्यायी दुसरा विषय घेता येत होता. परंतु आता सगळ्यांना अकरावी आणि बारावीला मराठी हा विषय निवडणे बंधनकारक असणार आहे, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.