उबाठाला बॅकफूटला ढकलण्यासाठी शिवसेनेची जय्यत तयारी
मुंबईत परवडणाऱ्या घरांसाठी सरकारच्या हालचाली सुरु
मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर आलेली असताना शिवसेनेने उबाठाला बॅकफूटवर ढकलण्याची जय्यत तयारी केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या योजना व स्वप्नपूर्तीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कंबर कसली असून जे उबाठा (UBT) सेनेला सत्ता असतानाही जमले नाही ते शिवसेनेने सत्तेत राहून करुन दाखविल्याचा संदेश शिवसैनिकांना व महाराष्ट्रातील जनतेला कृतीतून दाखवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व त्यांच्या सहकाऱ्यांनी हालचाली सुरु केल्या आहेत.
परवडणाऱ्या घरांसाठी महायुती सरकारने मेगाप्लान आखला आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. ते वर्षा निवासस्थानावर पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये बोलत होते. मुंबईकरांना परवडणारी घरे स्वस्त दरात मिळावीत, यासाठी सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजनेची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मुंबई शहर व उपनगरे झोपडपट्टीमुक्त व्हावीत, ४० लाख झोपडपट्टीवासियांना घरे मिळावीत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी महायुती सरकारचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनौपचारिक संवादात दिली. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी माध्यमकर्मींशी गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी मुंबईत परवडणाऱ्या घरांसाठी सरकारकडून सुरु असलेल्या हालचालींचा उल्लेख केला.
म्हाडा, एमएमआरडीए, सिडको यांच्या माध्यमातून एसआरएसह क्लस्टर डेव्हलपमेंटचे प्रकल्प
म्हाडा, एमएमआरडीए, सिडको यांना एकत्र करुन एसआरए आणि क्लस्टर डेव्हलपमेंटचे प्रकल्प राबवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली. मुंबईत घरभाडे अधिक असल्याने अनेकजण मुंबईबाहेर जातात. तसे होऊ नये म्हणून भाडे परवडणारी घरे उभारण्याचा सरकारचा मानस आहे. विक्रोळी, घाटकोपरमध्ये परवडणारी घरे उभारण्याची तयारी सरकारने सुरु केली आहे. रमाबाई आंबेडकर नगरात १७ हजार घरे साकारली जाणार आहेत. मागणीपेक्षा जास्त घरे उभारण्याची योजना आहे. त्यामुळे घरभाडे आपोआप कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. विक्रोळी, घाटकोपरमध्ये १७ हजार घरांचे काम सुरु आहे. इथे घरभाडे १५ हजार रुपये असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महत्त्वाकांक्षी योजनेसाठी प्रशासकीय पातळीवर लगबग
रमाबाई आंबेडकर नगरात परवडणारी घरे उभारण्यासाठी सरकारने भूसंपादन सुरु केले आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या साडे तीन लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले आहेत. त्यांना उर्वरित रक्कम लवकरच दिली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विधानसभा निवडणूक अवघ्या २ महिन्यांवर आलेली असताना महत्त्वाकांक्षी योजनेसाठी प्रशासकीय पातळीवर लगबग सुरु झाली आहे.
बाळासाहेबांचे स्वप्न शिवसेना साकार करुन उबाठांना धक्का देणार
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ४० आमदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले. पण मुंबईतील वर्चस्व ठाकरेंनी कायम राखले. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी मुंबईत ताकद दाखवली. ४ जागा लढवून त्यांनी ३ जागा जिंकल्या. चौथी जागा केवळ ४८ मतांनी गेली. ठाकरेंचं मुंबईतील वर्चस्व मोडून काढण्याचे प्रयत्न शिंदेंकडून सुरु आहेत. पण शाखांचे मोठे जाळे असल्याने ठाकरेंनी मुंबईत टिकाव धरला. लोकसभेतील समीकरणे पाहूनच शिवसेनेने मुंबईतील झोपडपट्टीधारकांच्या विकासासाठी विशेष योजना आखली आहे.