आदेश बांदेकरांच्या ‘या’ पोस्टमुळे चर्चेला उधाण
मुंबई : ‘दार उघड बये दार उघड’ असे म्हणत येणारे महाराष्ट्रातील सर्व वहिनींचे लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) ‘होम मिनिस्टर’ (Home Minister) कार्यक्रमामुळे सर्वांच्या घराघरात पोहोचले. हा प्रेक्षकांच्या आवडीचा आणि महिलांच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने गेली २० वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत अनेक वहिनींना पैठणीचा खेळ खेळण्याची संधी दिली. मात्र आता महिलांच्या मनावर राज्य करणाऱ्या या लोकप्रिय कार्यक्रमाबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाने महिलांना त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून महिलांना विश्रांती मिळण्यासाठी विविध खेळ काढले. तसेच या प्रवासात त्यांनी अनेक जोडप्यांच्या प्रेमकथा उलगडल्या. भावनांनी भरलेल्या या कार्यक्रमाने महाराष्ट्रभर अनेक वाऱ्या देखील केल्या. प्रत्येक टप्प्यावर प्रगती करणारा हा कार्यक्रम लवकरच निरोप घेणार आहे. आदेश बांदेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही बातमी प्रेक्षकांना दिली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या वहिनींसह प्रेक्षकांना धक्का बसला आहे.
काय म्हणाले आदेश बांदेकर?
‘२० वर्ष आनंदाची होती. झी मराठी या वाहिनीच्या माध्यमातून २० वर्षांत साधारण ६५०० भाग, अंदाजे ६ लाख २२५० कुटुबांसोबत थेट संवाद साधता आला. विविध कार्यक्रमांमधून ६० लाख प्रेक्षकांना आनंद देता आला. या प्रवासात अनेक कुटुंबांना आणि माऊलींना भेटत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान ऊर्जा देत होते आणि अजूनही अनेक कुटुंब ‘होम मिनिस्टरची’ वाट बघत आहेत. २० वर्षाच्या या प्रवासानंतर आता वेळ आली आहे विश्रांतीची, तेव्हा आज्ञा असावी.’
दरम्यान, कार्यक्रमाचा शेवटचा भाग हा येत्या काही दिवसांत प्रक्षेपित होणार आहे. २०व्या वर्षपूर्तीनिमित्त गणपती विशेष भाग चित्रित करण्यात येणार आहे. ‘उत्सव बाप्पाचा, खेळ होम मिनिस्टरचा’ असे त्याचे शीर्षक असणार आहे. मात्र त्यानंतर हा कार्यक्रम सगळ्यांचा निरोप घेणारा आहे.
View this post on Instagram