Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडी'लाडकी बहीण' योजना जम्मू-काश्मीरमध्ये राबवणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घोषणा

‘लाडकी बहीण’ योजना जम्मू-काश्मीरमध्ये राबवणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घोषणा

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहीरनाम्याचाही उल्लेख करत कलम ३७० इतिहासजमा झाले असून, आता कधीही परत येऊ शकणार नाही आणि आम्ही ते परत येऊ देणार नाही, असे ठणकावून सांगितले.

पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना अमित शहा म्हणाले की, ‘सुरुवातीपासूनच जम्मू-काश्मीर आमच्या पक्षासाठी खूप महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून राज्याला भारताशी जोडण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. आधी भारतीय जनसंघ आणि नंतर भाजपाने जम्मू-काश्मीरसाठी संघर्ष केला. २०१४ पर्यंत जम्मू-काश्मीर नेहमीच फुटीरतावाद आणि दहशतवादाच्या छायेत होता. पण, जम्मू-काश्मीरचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा २०१४ ते २०२४ सुवर्णमय असेल. यापूर्वीची कलम ३७०च्या छायेखाली सरकारे फुटीरतावाद्यांच्या मागण्यांपुढे झुकत असत, पण आता असे होत नाही,’ असे शहा म्हणाले.

‘मी नॅशनल कॉन्फरन्सचा अजेंडा वाचला. खुप खेदाची बाब आहे की, काँग्रेसने या अजेंड्याला मूक पाठिंबा दिला आहे. मला ओमर अब्दुल्ला यांना सांगायचे आहे की, आम्ही तुम्हाला गुज्जर बकरवाल आणि डोंगराळ भागात राहणाऱ्यांच्या आरक्षणाला हात लावू देणार नाही. कलम ३७० मुळे पूर्वी गुजर बकरवाल यांना आरक्षण मिळत नव्हते, ते आता मिळणार आहे.मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, फुटीरतावाद खतपाणी घालणारे कलम ३७० कधीही परत येऊ शकत नाही, आम्ही हे कधीही परत येऊ देणार नाही,’ अशी स्पष्टोक्ती अमित शहा यांनी यावेळी केली.

राज्यातील लोकांचा लोकशाहीवर विश्वास

शहा पुढे म्हणाले की, ‘लोकसभा निवडणुकीत ५८ टक्के मतदान हा विक्रम आहे. यावरून जनतेचा लोकशाहीवर किती विश्वास आहे, हे दिसून येते. २०२३-२४ मध्ये संघटित दगडफेकीची एकही घटना घडली नाही. एकही संघटित संप झाला नाही. घाटीत ३० वर्षांनंतर चित्रपटगृहे सुरू झाली आहेत. अमरनाथ यात्रा आणि वैष्णोदेवी यात्रा कुठल्याही विघ्नाविना पार पडली. २०१४ ते २०२४ ही दहा वर्षे जम्मू-काश्मीरच्या शांतता आणि विकासाची होती. जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात मोठी गरज शिक्षणाची होती. १० वर्षात ५९ महाविद्यालयांना मान्यता मिळाली आहे. आज देशभरातून मुले जम्मू-काश्मीरमध्ये शिकण्यासाठी येत आहेत. ६ हजार कोटी रुपये खर्चून दोन एम्स उघडण्यात आले, २२ हजार कोटी रुपये खर्चाचा जलविद्युत प्रकल्प पूर्ण होत आहे.’

जम्मू-काश्मीरसाठी भाजपच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

दहशतवाद आणि फुटीरतावादाचा पूर्णपणे नायनाट करू आणि जम्मू-काश्मीरला देशातील विकास आणि प्रगतीमध्ये अग्रेसर बनवू. माँ सन्मान योजनेंतर्गत प्रत्येक घरातील ज्येष्ठ महिलेला दरवर्षी १८ हजार रुपये दिले जातील. महिला बचत गटांच्या बँक कर्जावरील व्याजसाठी मदत. उज्ज्वला लाभार्थ्यांना दरवर्षी २ मोफत एलपीजी सिलिंडर. प्रगती शिक्षा योजनेंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता म्हणून वार्षिक तीन हजार रुपये. परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी वाहतुकीचा खर्च आणि एकवेळ अर्ज शुल्काची परतफेड. उच्च वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅबलेट-लॅपटॉप. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी जम्मूमध्ये प्रादेशिक विकास मंडळाची स्थापना. जम्मू, दल सरोवर आणि काश्मीरमध्ये पर्यटनाला चालना. नवीन उद्योग उभारले जातील, त्यातून रोजगार निर्माण होतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -