नवी दिल्ली : सध्या बाजारात सर्वच भाजीपाल्यांचे दर वाढत आहेत. अशातच कांद्याचे दरसुद्धा (Onion Rate) वाढले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे, त्या शेतकऱ्यांना (Farmers) याचा चांगला फायदा होत आहे. मात्र, कांद्याचे दर वाढत असताना सरकारनं दुसऱ्या बाजूला मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं कांद्याचे दर कमी करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. सरकार आता दिल्ली-एनसीआरमध्ये (Delhi NCR) ३५ रुपये किलो दराने कांद्याची विक्री करणार आहे. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वाढत्या दरातून सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे.
दिल्ली आणि लगतच्या शहरात कांदा ६० रुपये किलोवर
कांद्याच्या दरात दिल्ली-एनसीआरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या ठिकाणांना दिलासा देण्यासाठी सरकारनं आता कमी दरात कांद्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. तेथील ग्राहकांना यामुळं मोठा दिलासा मिळणार आहे. राष्ट्रीय राजधानी आणि लगतच्या शहरांमध्ये कांद्याचा भाव ६० रुपये किलोवर पोहोचल्यानंतर केंद्र सरकारने स्वत:हून सवलतीच्या दरात कांदा विकण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार आता या भागात ३५ रुपये किलोने कांदा विकणार आहे. बाजारातील भाव मोडीत काढणे हे सरकारचं उद्दिष्ट आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये आजपासून कांद्याची विक्री सुरु
दरम्यान, दिल्ली-एनसीआरमध्ये सरकार आजपासून कांद्याची विक्री सुरू करणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने यासाठी नाफेड आणि एनसीसीएफला आदेश दिले आहेत. सर्वसामान्यांना हे दोन्ही सरकारी युनिट ३५ रुपये किलो दराने कांदा उपलब्ध करून देणार आहेत.
एनसीसीएफ आणि नाफेडच्या माध्यमातून कांद्याची विक्री
नाफेड आणि एनसीसीएफ या दोन्ही सरकारी संस्था सर्वसामान्यांना सरकारच्या वतीने स्वस्त दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचं काम करतात. या दोन्ही संस्था मध्यवर्ती दुकाने, मोबाईल व्हॅन आणि इतर माध्यमातून सवलतीच्या भावात खाद्यपदार्थ लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. गतवर्षी देशभरात कांद्याचे आणि टोमॅटोचे भाव प्रचंड वाढले असताना सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून लोकांना स्वस्त दरामध्ये टोमॅटो आणि कांदे उपलब्ध करून दिले होते.
डाळीसह तांदळाची देखील स्वस्त भावात विक्री
महागाईपासून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार विविध निर्णय घेत आहे. सरकार सध्या स्वस्त दरात पीठ, डाळ, तांदूळ विकत आहे. गेल्या वर्षीच सरकारने ‘भारत’ या ब्रँड नावाने बाजारात पीठ, डाळी आणि तांदूळ आणले होते.