मुंबई : मुंबईच्या चेंबूर (पश्चिम) भागात बुधवारी सायंकाळी एकमजली घराचा स्लॅब आणि लोखंडी अँगल कोसळल्याने दीड वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सरस्वती गल्लीत घडलेल्या या दुर्घटनेत, छोटी खुशी साळवे गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या दुर्घटनेत ३५ वर्षीय कविता साळवे जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिकांनी त्वरित मदतकार्य केले. महापालिकेकडून अधिकृत मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
चेंबूरमधील या दुर्घटनेच्या काही तासांपूर्वीच मुंबईच्या पूर्व उपनगरातील विद्याविहार आणि विक्रोळी येथे दोन इमारत दुर्घटना घडल्या. विद्याविहारमध्ये एक बांधकाम सुरू असलेल्या १५ मजली इमारतीची बांबूची संरचना कोसळली, ज्यात दोन कामगार नबियाद शेख (२६) आणि मोहन शेख (३८) जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विक्रोळीतील वर्षानगर भागात डोंगरावरच्या घराची भिंत कोसळून दोन व्यक्ती जखमी झाल्या. त्यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला आणि स्थानिक डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. या दुर्घटनेमुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून दोन घरे रिकामी करण्यात आली असून रहिवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
या तीन दुर्घटनांमुळे मुंबईत बांधकाम आणि घरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या सर्व घटनांच्या कारणांची तपासणी करत आहेत.