Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवून उद्धव ठाकरे यांनी पैसे घेऊन महाराष्ट्राशी तडजोड...

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवून उद्धव ठाकरे यांनी पैसे घेऊन महाराष्ट्राशी तडजोड केली

शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर यांचा खळबळजनक दावा

मुंबई विमानतळावरील पुतळा काढण्यासाठी उबाठा आणि जीव्हीकेमध्ये डील

मुंबई- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे दिले गेले. मात्र विमानतळाजवळील महाराजांचा अश्वारुढ पुतळा हटवण्यास बाळासाहेबांचा विरोध असताना देखील उद्धव ठाकरे यांनी ‘जीव्हीके’ कंपनीशी डील केली. महाराजांचा पुतळा हटवून उबाठाने महाराष्ट्राच्या अस्मितेची केवळ कमिशनसाठी तडजोड केली, असा खळबळजनक दावा शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर यांनी केला. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबई विमानतळाचे विस्तारीकरण करण्यासाठी जीव्हीके कंपनीने सहार पोलिस स्टेशन आणि महाराजांचा अश्वारुढ पुतळा हलवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र याला बाळासाहेबांनी पहिला विरोध केला होता. याविषयी कंपनीशी देणंघेणं करण्यासाठी उद्धव ठाकरे गेले होते. छत्रपतींच्या नावाने तुम्ही किंमत विचारायला गेला होतात आणि ती किंमत तुम्ही घेतलीत, असा थेट आरोप पावसकर यांनी यावेळी केला.

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत झालेला प्रकार दुर्देवी आहे. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी माफी मागितली, मात्र त्यावर उबाठा गटाकडून सुरु असलेले राजकारण निंदनीय आहे, अशी टीका पावसकर यांनी केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांच्याकडे माफी मागण्याची हिंमत उबाठा यांनी का दाखवली नाही, भारत जोडो यात्रा काढणाऱ्यांना सावकरांचा अपमान केल्यावर गेट आऊट करण्याची धमक उद्धव ठाकरे यांनी का दाखवली नाही, असा खरमरीत सवाल पावसकर यांनी केला. छत्रपतींच्या नावाने राजकारण करणारे आज गळा काढत आहेत, अशी टीका पावसकर यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी उबाठाचे प्रवक्ते महाराष्ट्रात दंगली उसळणार असे वारंवार सांगत होते. पण सरकारने असा कुठलाही प्रकार होऊ दिला नाही. परंतु आता पुन्हा उबाठा गटाचा खरा चेहरा समोर आल्याचे पावसकर म्हणाले. उबाठा गटाचे चंद्रकांत खैरे यांनी पुतळा दुर्घटनेनंतर राज्यात दंगली घडाव्यात, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरुन उबाठा गटाला महाराष्ट्रात दंगली घडवायच्या होत्या का, असा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे खैरे यांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही पावसकर यांनी केली.

शिवचरित्राचे अभ्यासक दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र लोकांपर्यंत पोहचावे म्हणून आयुष्य वेचले मात्र त्यांची बदनामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केली. पुरंदरेंचा मानसिक छळ केला, असे पावसकर म्हणाले. शरद पवार ४० वर्षांनंतर रायगडावर जाऊन आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ थेट महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. यात कोणत्याही दलालांना पैसे मिळणार नाही. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ही योजना कशी बंद होईल, यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -