मुंबई : सध्या गणेशोत्सवाची लालबाग-परळमध्ये (Lalbuag) जोरदार तयारी सुरु आहे. गणेश उत्सव म्हटलं की मुंबईतली तुफान गर्दी समोर येतेच. आता गणेशोत्सवाला अवघे पाच आणि सहा दिवस राहिलेले असताना आणि सगळीकडेच बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु असताना मुंबईतलं लालबाग अपघाताने हादरून गेलंय. बेस्टची बस अनियंत्रित झाली आणि लालबागमध्ये उत्सवाच्या रंगाचा बेरंग झाला. बेस्टचा अपघात झाल्याने ९ जण गंभीर जखमी झाले. या घटनेत एका तरुणीचा मृत्यू झालाय. लालबाग परिसरात राहणारी २८ वर्षीय नुपूर मणियार या अपघातात मरण पावली.
नेमकी काय घटना घडली?
२८ वर्षीय नुपूर मणियारचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. बेस्ट बसमधला मद्यधुंद प्रवासी नुपूरच्या मृत्यूसाठी कारण ठरला. बस अनियंत्रित होण्यासाठी हाच प्रवासी जबाबदार होता. बेस्टची ६६ क्रमांकाची बस बॅलार्ड पिअर या ठिकाणाहून राणी लक्ष्मीबाई चौक सायनच्या दिशेने जात होती. बस लालबागच्या गणेश टॉकिजजवळ आली त्यावेळी मद्यधुंद प्रवासी आणि चालक यांच्यात वाद झाला. वाद घालणाऱ्या प्रवाशाने बेस्ट बसचं स्टिअरिंग खेचलं. त्यामुळे चालकाचा बसवरचा ताबा सुटला आणि बसने ९ जणांना उडवून लावलं. या घटनेत नुपूर मणियारने आपला नाहक जीव गमावला.
१ सप्टेंबरच्या रात्री झाला अपघात
नुपूर मणियार या तरुणीचा अपघाताता मृत्यू झाला. एका कुटुंबातल्या कर्त्या मुलीचा मृत्यू झाल्याने हे कुटुंब हळहळून गेलंय. नुपूर मणियारच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबाचा आधार हरपला आहे. मणियार कुटुंबातली लेक गेली याला जबाबदार कोण? असा प्रश्न शोकाकुल मणियार कुटुंबाने विचारला आहे. नुपूर मणियार ही मणियार कुटुंबातली कर्ती मुलगी होती. तिचं लग्न ठरलं होतं. करोना काळात तिच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर तिच्या आई आणि बहिणीची जबाबदारी नुपूर सांभाळत होती. मात्र काळ आला आणि घात करुन गेला. लालबागच्या अपघातात नुपूरचा दुर्दैवी मृत्यू झाला.
६६ क्रमांकाच्या बसचा लालबागमध्ये अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, सीएसटीहून सायनला जाणारी ६६ नंबरची बस चिंचपोकळी येथून खाली उतरत लालबाग सिग्नल जवळ पोहोचली.नंतर त्या सिग्नल जवळच एक दुर्दैवी अपघात घडला. दारुच्या नशेत धुंद असलेल्या एका प्रवाशाच्या चुकीमुळे हा अपघात घडला. प्रवासी थांबा नसतानाही हा मद्यधुंद प्रवासी बस थांबवा असं सारखं सांगत असल्यामुळे बेस्टच्या बस चालकासोबत वाद घालत होता. यानंतर कहर म्हणजे, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशानं ड्रायव्हरच्या अंगावर हात टाकला. अन् यामुळे बसचं नियंत्रण सुटलं आणि रस्त्यावरील गाड्यांना धडक दिली. मद्यधुंद अवस्थेत असलेला हा प्रवासी दत्ता शिंदे अपघातानंतर पळून जात होता. मात्र, वाहकानं त्याला पकडलं अन्यथा ड्रायव्हर या घटनेत निष्पाप अडकला असता. या घटनेनंतर काळाचौकी पोलिसांनी आरोपी दत्ता शिंदे याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
नुपूरच्या आई-बहीण यांची जबाबदारी कोण घेणार?
एका दारूच्या नशेत असलेल्या या दत्ता शिंदेमुळे अपघातात अनेक गाड्यांचं नुकसान झालंय. तर आठ लोक यामध्ये गंभीर जखमी आहेत. तर एका निष्पाप आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असणाऱ्या नुपूर मणियार या मुलीचं निधन झालं आहे. त्यामुळे आता या कुटुंबाचं काय होणार? याचा प्रश्न कुटुंबीयांना आणि सर्वच मित्रमंडळींना पडला आहे.