मुंबई : गणेशोत्सव आणि कोकणाचं एक अनोखं समीकरण आहे. गणेशोत्सवाचा कोकणात एक वेगळाच जल्लोष आणि मज्जा मस्ती पाहायला मिळते. गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या फार मोठी असते. गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांनी पहिली पसंती राज्य परिवहन (एसटी) महामंडळाला दिली आहे. मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या सर्व एसटी बसेस फुल्ल झाल्या आहेत.
येत्या ७ सप्टेंबरला गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ४२०० गट आरक्षणासह एकूण ४९५३ जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झाल्या आहेत. मुंबईहुन कोकणात गणपती उत्सवाला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा ०३ सप्टेंबर ते ०७ सप्टेंबरदरम्यान ५००० जास्त बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केलंय. विशेष म्हणजे व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जाते आहे.
चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी
मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील येत्या ३ सप्टेंबर पासून प्रमुख बसस्थानकातून जास्त बसेस सोडण्यात येणार आहेत. गणेशोत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अगदीच जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी आणि एसटी याचं एक अतुट नातं आहे. आपल्या गावी अगदी वाडी-वस्तीपर्यंत मुंबईतून कोकणात थेट फक्त एसटीच चाकरमान्यांना सुखरूप पोहोचवते. त्यामुळे दरवर्षीचं गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते.
तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार
यंदा एसटीतर्फे सर्व विक्रम तोडून सुमारे ५००० जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केलं आहे. गणेश भक्तांचा प्रवास सुखी व्हावा म्हणून, ३ ते ७ सप्टेंबर या काळात वाहतूक सुरळीत होण्यासाठी एसटीच्या विविध उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणामधील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकही तैनात करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.