मोक्षदा नूलकर- ग्राहक पंचायत समिती
हिरवे हिरवेगार गालिचे
रानभाज्यांनी फुलले रे…
‘थेंब आभाळीचा टपकावा
मातीवर व्हावा शिडकावा
धरतीवरती जणू नव्याने
अंथरावा गालिचा रानभाज्यांचा…
मुद्दाम लागवड न केलेल्या आणि कोणतीही काळजी न घेता निसर्गतः उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हटले जाते. जंगलात, शेतात, घराच्या अंगणात जणू निसर्गाने केलेली लागवड. ज्या मातीत पोषणमूल्ये तेथेच या वाढतात. काही रानभाज्या पहिला पाऊस पडला की, लगेचच उगवतात. भारंगी, फोडशी (कुल्लू), पुनर्नवा, केना, कुर्डू, टाकळा, शेवगा, शेवळं, आघाडा, मुटमारी, गाबोळी, अंबाडी, अळू, लाल माठ अशा अनेक रानभाज्या खाल्ल्या जातात. हल्लीच्या काळात रानभाज्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचू लागल्याने ठिकठिकाणी त्यांचे महोत्सव किंवा स्पर्धा भरवल्या जाऊ लागल्या आहेत. विदर्भात हवेतील आर्द्रता कमी होऊ लागते व तापमानात वाढ होते, तेव्हाच घोळू, चिवई या भाज्या उगवतात. या भाज्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. भारंगी अनेक रोगांवर उपयुक्त ठरते. थायरॉइडसाठी भारंगीच्या मुळाचा वापर होतो. वैद्य औषधासाठी भारंगीची फुले, फळ, पाने या सगळ्यांचा वापर करतात.
फोडशी / कुल्लू / देवकृपा ही रानभाजी गवताच्या पात्याप्रमाणे दिसते. पावसाच्या सुरुवातीला कोवळी पाने असतात, तेव्हाच भाजी खावी. चवीला थोडी कडवट असते. या भाजीला श्वेत मुसळी किंवा पांढरे सोने असेही म्हणतात. कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. यात फायबर जास्त आढळते. केना – सह्याद्रीच्या उतारावर दऱ्याखोऱ्यात, माळरानावर आणि आपल्या कुंडीत उगवणारी अतिशय दुर्लक्षित अशी वनस्पती. हीच्या फुलांपासून रंग तयार केला जायचा. अत्यंत बहुगुणी औषधी वनस्पती असून हिचा रस पिण्याने आपण निरोगी राहतो. सर्पदंशावरही वापरली जाते. कुर्डू ही जंगली वनस्पती आहे. पावसाळ्यात खूप उगवते. हृदयविकारावर गुणकारी आहे. टाकळा/तरोटा नावाप्रमाणे तुरट असते. माळरानावर मोठ्या प्रमाणात उगवतो. पिवळी फुले असतात. कोवळ्या पानांची भाजी करतात. वातदोषावर अतिशय गुणकारी. ब्राह्मणी / यष्टिका / वैद्याचा दंड असे म्हणतात. उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीला येते. त्वचारोग, अस्थमासाठी वापरतात. आदिवासी लोक टाकळ्याच्या शेंगांमधील बिया वाळवून तिची पावडर करून कॉफी म्हणून वापरतात.
शेवग्याची पाने, फुले, शेंगा, बिया सगळ्याचे औषधी उपयोग आहेत. आपली प्रतिकारशक्ती वाढवतात. हाडे मजबूत करतात. शेवग्याच्या बिया पाणी शुद्ध करण्याकरिता वापरतात. शेवग्याच्या कोवळ्या पानाचा रस सात दिवस घेतल्यास वात कमी होतो. पुनर्नवा/खापरखुटी ही भाजी आंबट असते. मूत्रविकारांवर उपयुक्त ठरते. पुनर्नवा या नावाचाच अर्थ आहे – नवीन जन्म घेणे, नवीन पेशी तयार करणे. यकृताच्या आजारासाठी उपयुक्त भाजी. शेवळं किंवा जंगली सुरण केळफुलासारखे सोलून घ्यावे लागते. आतील भाग खाजरा असतो, म्हणून काकड्याची फळे भाजीत घालावी लागतात. यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. स्त्रियांच्या आजारावर गुणकारी आहे. विदर्भात बाभळीच्या शेंगांची भाजी करतात. दंतरोगांवर उत्तम औषध आहे. हाडांसाठी उपयुक्त. वृक्षाची साल काळसर असते. त्यात १२ ते २० टक्के टॅनिन असते, औषधी म्हणून याचा वापर केला जातो. लाखेचे किडे वाढवण्यासाठी याच्या डिंकाचा उपयोग होतो. बाभूळ डिंक पौष्टिक असल्याने डिंकाचे लाडू केले जातात. याचे लाकूड टणक असते. बाभळीची साल औषधी आहे.
गौरी-गणपती आले की, आघाड्याची पाने दिसू लागतात. गणपतीत २१ पत्रींमध्ये आघाड्याचे महत्त्व आहे. आघाड्याच्या पानांची भाजी करतात. भूक वाढवणे, वातदोष, हृदयरोग, श्वसन रोग यांवर गुणकारी. गाबोळी/चाईचा मोहोर/उलशीचा मोहोर, हीच्या वेलींवर द्राक्ष्याच्या घडासारखी बारीक फळे लागतात, त्याला गाबोळी म्हणतात. गौरी-गणपतीत गौरींवर वाहण्यासाठी ती आणली जाते. या भाजीत प्रोटिन्स भरपूर असतात. अंबाडी/ लोनी/कुल्फा भाजी नावाप्रमाणेच आंबट असते. याची फुले, दांडे लाल रंगाचे असतात. अंबाडीच्या फुलाची पावडर आंबट चवीसाठी व सरबतासाठी वापरतात. फुलांची चटणी सुद्धा करतात. ए आणि सी व्हिटॅमिन तसेच झिंक, आयर्न यात भरपूर प्रमाणात असतात. ही भाजी खाल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते. रान केळीचे कंद सुप्त अवस्थेत जमिनीत असतात. पहिला पाऊस पडला की कोंब येतात. ग्रामीण भागात आजही रान केळ्याची भाजी चवीने खातात. शिवाय पाने मोठी असतात त्यामुळे द्रोण व जेवणासाठी ती वापरता येतात. प्लास्टिकला हा चांगला पर्याय आहे. लाल माठ, टोकेरी माठ, अळू म्हटले की, आपल्याला सगळ्यांना ऋषीपंचमीला ऋषीची भाजी करतात याची आठवण होते.
या भाज्यांत लोह, अँटीऑक्सिडंट्स, फायबर खूप प्रमाणात असल्याने त्या खाल्ल्याच पाहिजेत. ऋतुमानानुसार येणारे आजार बरे करण्याची ताकद या रानभाज्यांमध्ये असते. आदिवासी जमाती दैनंदिन खाद्यान्नात अनेक रानभाज्यांचा उपयोग करतात, कारण तेच त्यांचे पारंपरिक अन्न आहे आणि त्याविषयीचे ज्ञान नव्या पिढीपर्यंत सहजरीत्या पोहोचते. यावरून निसर्गाशी त्यांची नाळ कशी जुळली आहे ते कळते. आदिवासी जंगलातून या भाज्या गोळा करून आणतात आणि विकतात. या भाज्या आपण विकत घेऊन खाल्ल्या, तर त्यांना चार पैसे मिळतील, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. जंगलात वाढत असल्याने रासायनिक खताचा वापर केलेला नसतो. एका अर्थी या भाज्या ‘ऑरगॅनिक’ म्हणता येतील. यामुळेही आपले आरोग्यही छान राहील. रानभाज्यांची संपूर्ण माहिती घेऊनच त्या खाव्यात. तसे न केल्यास विषबाधेचा धोका असतो. ग्राहक जसा सजग हवा तसा तो सुदृढही हवा. शहरात कोबी, फ्लॉवरसारख्या भाज्या दूरवरून आणाव्या लागतात. त्यामुळे वाहतूक खर्च जास्त होतो. शिवाय प्रदूषणात भर पडते ती वेगळीच. म्हणूनच सर्वच दृष्टीने रानभाज्या खाणे योग्य.