मालवण राजकोटप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मागितली जाहिररित्या माफी
मुंबई : मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काही दिवसांपूर्वी कोसळला. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच पेटले असून यावरुन विरोधक आणि सामान्य नागरिकही संतापले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीररित्या माफी मागितली आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर कोसळल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे. शिवभक्तांमध्ये संतापाचा कडेलोट झाला असून सर्वत्र शिवरायांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागत विरोधकांनाही आवाहन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली श्रद्धा, अस्मिता आहे यावर विरोधकांनी राजकारण करू नये, सर्वांनी एकमताने शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा त्या ठिकाणी कसा उभा राहील, यासाठी सहकार्य करावे, असे शिंदेंनी म्हटले आहे.
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधक माफीची मागणी ते करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या चरणावर मी एकदा नव्हे १०० वेळा डोके ठेवायला तयार आहे. १०० वेळा माफी मागायला कमीपणा वाटणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच आम्ही राज्याचा कारभार करतो. मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांनीही सद्बुद्धी द्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार पुतळा तिथे उभारण्यासाठी ज्या काही सूचना असतील त्या विरोधकांनी सांगितल्या पाहिजेत. सहकार्य केले पाहिजे. झालेली घटना दुर्दैवी आहे. नौदलाने चांगल्या भावनेने तो पुतळा उभारला, पण ही घटना घडलेली आहे. या घटनेचे राजकारण करणे, त्यापेक्षा दुर्दैवी आहे. राजकारण करायला इतर मुद्दे आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज आपली श्रद्धा, दैवत आहे. यावर राजकारण करू नये, असे त्यांनी सांगितले.
तसेच कालच्या बैठकीत तो संपूर्ण परिसर संरक्षित करावा अशी मागणी नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांना तिथे पाहणी करणे आणि हा पुतळा पुन्हा उभे करणे यासाठी ते कटिबद्ध आहे. अजित पवारांनीही जाहीर माफी मागितली. शिवसेना, भाजपा आणि अजित पवार आम्ही सगळे महायुतीत काम करतो. छत्रपती शिवाजी महाराज हा विषय राजकारणाचा नाही. हा विषय आमच्यासाठी श्रद्धा आणि अस्मितेचा आहे. त्यामुळे कुणीही यामध्ये राजकारण न करता शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा तिथं उभा कसा राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
दरम्यान, मालवणची घटना अतिशय दुर्दैवी, मनाला वेदना देणारी आहे. नेव्हीने जो कार्यक्रम तिथे घेतला. तो चांगल्या भावनेने घेतला होता. दुर्दैवाने शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला. त्याबाबत काल महत्त्वाची बैठक बोलावली होती. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेव्हीचे अधिकारी आणि आपले अधिकारी होते. त्यात २ संयुक्त समिती स्थापन केली. त्यात एक समिती दुर्घटना कशी झाली त्याची चौकशी आणि कारवाई करेल. दुसरी समिती त्यात तज्ज्ञ, शिल्पकार, आयआयटी, इंजिनिअर, नेव्हीचे अधिकारी असतील त्या समितीच्या माध्यमातून लवकरात लवकर शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे उभा राहिले, ही जनसामान्यांची भावना आहे. त्यावर आम्ही लक्ष केंद्रीत करतोय. अनेक शिल्पकारांना आम्ही बैठकीला बोलावले होते. मालवणात पुन्हा मजबुतीने पुतळा उभा राहावा. लोकांच्या भावना तीव्र आहेत त्या आम्ही समजू शकतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.