मुंबई : काल देशभरात मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. मुंबईत दरवर्षीप्रमाणे विविध ठिकाणी दहीहंडीचे (Mumbai Dahi Handi) आयोजन करण्यात आले होते. तसेच अनेक भागांत स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या होत्या. एकीकडे दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे थरावरुन कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाले आहेत. त्यामुळे दहीहंडी सणाला गालबोट लागले आहे. मुंबईत आतापर्यंत २४५ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यांच्यामध्ये बालगोविंदाचांही समावेश असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये गोविंदांच्या उपचारासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. केईएम रुग्णालयात ५२, नायर रुग्णालयात १२, सायन रुग्णालयात २०, सेंट जॉर्ज रुग्णालयात ८, जी.टी. हॉस्पिटलमध्ये ६, पोद्दार रुग्णालयात २८, राजावाडी रुग्णालयात १३, कुर्ला भाभा रुग्णालयात ५ आणि इतर अनेक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींच्या स्थितीवर विशेष लक्ष दिले जात आहे.
दरम्यान, ठाण्यातही १९ गोविंदा जखमी झाले आहेत, त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. प्रशासनाने या परिस्थितीत त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली आहे. दहीहंडी उत्सवाच्या आनंदात अशी अपघातांची मालिका यंदा पुन्हा घडल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजनांवर अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली आहे.
तर उत्सवातील जखमींवर वेळीच उपचार केल्यामुळे बरेच जण घरी परतले असले तरी काहींची प्रकृती गंभीर राहिल्यामुळे काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन गोविंदांची प्रकृती गंभीर
मुंबईतील गोविंदांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. कुणाल पाटील (२०) या तरुणाला पाठीच्या मणक्याला दुखापत झाली आहे. तर मनू खारवी (२५) याच्या डोक्याला मार लागला आहे. सध्या दोघांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.