यावर्षी पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पावसाळ्यामध्ये सगळ्याच गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते. उदा, केसांची, आरोग्याची, त्वचेची पण तुम्हाला हे माहितेय का, या सगळ्या गोष्टींसोबतच आपल्याला कपड्यांची सुद्धा काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. पावसाळ्यात आपले कपडे न सुकणे, ओले राहणे ही समस्या तर अगदी सामान्यच आहे. प्रत्येकांच्याच घरामध्ये पावसाळ्यात कपडे जसे पाहिजे तसे वाळत नाहीत. त्याच्यामुळे कपड्यांचा एक आंबट, कुबट वास यायला लागतो. अशाने कपड्यांचा वास आल्याने अंगावर ते कपडे परिधान करावेसे वाटत नाहीत.
प्रत्येकाच्या घरी पावसाळ्यात सर्वानाच या समस्येचा त्रास होतो. कपडे सुकण्यासाठी आपण ३-३ दिवस लावतो की, आज सुकत नाही तर उद्या सुकतील असं आपलं नेहमी चालूच असतं. आणि जर घराला छोटीसुद्धा खिडकी नसेल तर ३रा दिवससुद्धा लागतो. अशातच ओले, आंबट तसंच कुबट वास येणारे कपडे परिधान केल्याने सारखं त्याच वासाने आपलं डोकं ठणकावत असतं. याशिवायच त्या कपड्यावर बॅक्टेरिया सुद्धा तयार होतात. असे वास येणारे कपडे परिधान केले की त्वचेशी निगडित काही समस्या उद्भवतात. याच्यामुळेच आज या माहितीमधून कपडे वाळवण्याच्या काही सिंपल टिप्स, तसेच कपड्यानां वास येऊ नये यासाठी काय केलं पाहिजे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
फॅन सुरू ठेवा
पावसामध्ये बाहेर जोरदार पाऊस पडत असल्यामुळे पाहिजे तसा सूर्यप्रकाश सुकत घातलेल्या कपड्याना मिळत नाही. त्यामुळे आपण घरच्या घरी कपडे वाळत ठेवतो. अशावेळी तुम्हाला घरीच कपडे सुकण्यासाठी ठेवायचे असतील तर त्यासाठी जागा मोकळी असली पाहिजे. घरातील पंखा बंद ठेऊ नका. कपडे सुकण्यासाठी पंखा सुरूच ठेवा. त्यामुळे तुमचे कपडे लवकरात-लवकर वाळतील आणि खराब वास देखील येणार नाही.
लिंबाचा रस
कपड्याना आंबट वास येऊ नये यासाठी तुम्हाला लिंबाचा रस खूप उपयुक्त ठरेल. कपडे धुवून झाल्यानंतर एका बादलीत पाण्यामध्ये लिंबाचा रस पिळून घ्या. यानंतर त्यामध्ये धुतलेले कपडे टाका. कपड्याना या पाण्यात छान भिजवून घ्या. नंतर कपडे पिळून घ्या. कपड्यांमध्ये लिंबाचा रस पसरल्याने कपड्यांचा वास येत नाही, आणि बॅक्टेरीया सुद्धा कपड्यांमध्ये जमा होत नाही. त्यामुळे कपड्यांमध्ये लिंबाचा रस चांगला मिसळा.
रोजच्या-रोज कपडे धुवा
आपण आपले रोजचे कपडे रोजचं धुतले पाहिजेत. कारण कपडे दररोज न धुता जर जास्त साठवून ठेवल्यास कपड्यांचा ढीग एकाच दिवशी जास्त पडतो. कारण जर तुम्ही मशीनमध्ये कपडे धुवत असाल तर एकाच दिवशी जास्त कपडे असल्यास ते नीट धुतले सुद्धा जात नाहीत आणि लगेच सुकत सुद्धा नाहीत. शिवाय त्यांना सुकवण्यासाठी घरात जागा कमी पडते. त्यामुळे खूपच गिचमिड करून आपण कपडे सुकत टाकतो. त्यामुळे हवा लागत नसल्यामुळे कपड्यानां वास येण्यास सुरुवात होते.
व्हिनेगर आणि बेकिंग सोडा
कपड्यांमध्ये येणारा कुबट आणि आंबट वास बंद होण्यासाठी त्याच्यामध्ये व्हिनेगर आणि बेकिंग सोडा चांगल्या प्रकारे मिक्स करा. ही पद्धतसुद्धा कपडे धुवून झाल्यानंतर करायची आहे. याच्यासाठी एका बकेट्मधे व्हिनेगर व बेकिंग सोडा मिक्स करा त्यात कपडे भिजवून ठेवा. असं केल्याने कपडे स्वच्छ होतील. आणि कपड्याना दुर्गंधही येणार नाही