मुंबई: बदलापूरमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन विरोधकांनी महायुती सरकारची कोंडी केली असताना आता भाजपने दिशा सालियन (Disha Saliyan) मृत्यूप्रकरणावरुन आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याविरोधात पोल उघडली आहे. सध्या आदित्य ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर येथे आहेत. आदित्य ठाकरे जिथे राहत असलेल्या रामा इंटरनॅशनल हॉटेलबाहेर सोमवारी, (२६ ऑगस्ट) या दिवशी त्यांना भाजपचे कार्यकर्ते येऊन धडकले. तेव्हा त्याठिकाणी असलेल्या ठाकरे गटाचे कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांना घेरण्यासाठी आलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर येऊन ठाकरे गटाचे कार्यकर्ते तुटून पडले. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन दोन्ही बाजूचा जमाव पांगवला आहे. तिथे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे सध्या रामा इंटरनॅशनल हॉटेबाहेर तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन प्रकरणात नवीन गंभीर आरोप केले आहेत.
दिशा सालियन हिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. या सामूहिक बलात्कारामध्ये आदित्य ठाकरे यांचाही सहभाग आहे. दिशा सालियन अत्याचार प्रकरणात लहान मुलांचा रोल काय होता, हा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारावा. उद्धव ठाकरे , आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते महिला अत्याचाराबाबत बोलतात. मग अशातच भाजपचे कार्यकर्ते दिशा सालियन प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारत असतील तर त्यामध्ये गैर काय आहे? पण तिकडे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी पाहायला मिळाली. आदित्य ठाकरे हॉटेलमध्ये लपून बसलाय. बाहेर येण्याची त्याची का हिंमत झाली नाही? दिशा सालियन प्रकरणाबाबत उत्तर देऊन आदित्य ठाकरे आम्हाला गप्प का करत नाहीत, असा गंभीर सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.
आ. राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे अलीकडे महिला अत्याचारावर बोलत आहेत. मात्र आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यावर महिला अत्याचार प्रकरणी अनेक आरोप झाले आहेत. आदित्य ठाकरे यांना दिशा सालीयान वरील सामुहिक बलात्कार, तिच्या खून प्रकरणी प्रश्न विचारण्यात काहीच चुकीचे नाही. पत्रकारांनी आदित्य यांना प्रश्न केला असता ते सांगतात की हा राजकीय विषय आहे पण दिशा, सुशांतसिंग राजपूत खून प्रकरण तसेच अल्पवयीन मुलांच्या छळाचा मुद्दा हा राजकीय विषय होऊच शकत नाही असा प्रहार आ. राणे यांनी केला.
आदित्य यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशा सालीयान खून प्रकरणी आपला संबंध नाही असे पुरावे द्यायला हवे होते. आदित्य यांनी ८ जून च्या त्यांच्या लोकेशनचे पुरावे देत केले जाणारे सर्व आरोप खोटे असल्याचे सिद्ध करायला हवे होते. तुमचे निर्दोषत्व सिद्ध केले तर मी ठाकरे कुटुंबाची माफी मागायला तयार आहे असेही आव्हान आ. राणे यांनी दिले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशा प्रकरणी आरोप झालेल्या आदित्य यांचा राजीनामा का घेतला नाही. उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर डॉ. स्वप्ना पाटकर यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. या महिलेने संजय राऊत यांच्याविरुद्ध उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तक्रार केली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळेच महिला अत्याचार प्रकरणी बोलण्यापूर्वी आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पहावे, असेही आ. राणे म्हणाले.
मात्र, अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या प्रकरणारवर भाजपवरच आगपाखड केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. मग भाजपने याबाबत गृहमंत्र्यांनाच प्रश्न विचारावेत, असे दानवे यांनी म्हंटल आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
आदित्य ठाकरेंनी दिशा सालियन प्रकरणाबाबत भाजपने केलेल्या आरोपांबाबत मोजक्याच शब्दांत प्रत्युत्तर दिले. भाजपचे नेते ज्यांना घाबरतात, त्यांचीच बदनामी करण्याचं काम ते करतात, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. एका पोलीसावर महाराष्ट्रात कोयता गँगने हल्ला केला. आमच्या काळात असे कधी घडले नाही. पण आता मात्र पोलिसांवर हल्ले वाढले आहेत, महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. बदलापूर घटनेतील वामन म्हात्रेंना भाजपने पक्षातून का काढलेले नाही. रस्त्यावर आंदोलन करणाऱ्यांवर तुम्ही गुन्हे दाखल केले. पण पोलिसांना बलात्कार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करायला 10 दिवस लागले, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.