तरंग- डॉ. अनिल कुलकर्णी
सुखाची अनुभूती हीच आनंदाची अनुभूती असते. अंतर-बाह्य बदलल्याशिवाय सुख व आनंद मिळत नाही. अनेकांना सुख कळले पण वळले नाही. सुख म्हणजे नक्की काय असते? याचे उत्तर प्रत्येकाचे वेगळे-वेगळे असते. अनेकांना सुख कळले पण सुखाच्या पायवाटा कळल्या नाहीत. सुख मिळवण्याची प्रत्येकाची धडपड असते.
सुख मृगजळाप्रमाणे असते. त्याच्यामागे जेवढे तुम्ही धावाल तेवढी तुमची दमछाक होते. आयते मिळालेल्या सुखांपेक्षा संघर्षातून आलेले सुख मनाला वेगळाच आनंद देऊन जाते. सिद्धार्थ ते गौतम बुद्ध हा प्रवास आयत्या सुखाने दिला नाही, तर दुःखांनीच गौतम बुद्ध व
त्यांचे तत्त्वज्ञान अवतरले. ज्यांना सुख कळले त्यांना जीवन कळले.
सुखाचे क्षण दंवबिंदूसारखे असतात. एखादी अवस्था एखादे क्षण जगणे म्हणजेच सुख कळणे
होय. दवबिंदू आपल्या अस्तित्वाचा इतिहास मागे
सोडत नाहीत.
सुख अत्तराच्या कुपीत ठेवले, तर आठवणीचा सुगंध दरवळतो. एखादा ध्यास मनात ठेवून सतत कार्यरत राहिले तर सुखसुद्धा आपल्याकडे पायघड्या घालत येते. पैसा हेच सर्वस्व मानणाऱ्यांना सुख हे मृगजळाप्रमाणे हुलकावणी देते.
प्रत्येक गोष्टीमध्ये कम्फर्टझोन पाहण्यामध्ये माणसे संघर्षच विसरली आहेत. पैसा आला की, माणसे चारचाकी गाड्यांमधून हिंडतात, चालणे जवळ जवळ संपलेच. घरात पुन्हा सायकल, ट्रेडमिल आणून ठेवतात. आम्हाला हे सगळं कळतं पण वळत नाही. काही ठिकाणी काही विशिष्ट वर्गामध्ये पिझ्झा, बर्गर यांची रेलचेल असल्यामुळे पौष्टिक आहार मिळतच नाही आणि मग आयुष्याच्या उत्तरार्धात गोळ्या, इंजेक्शन, प्रोटीन पावडर याच्यावर माणसे जगत आहेत. सुख मिळवण्याची साधने समजली पण सुख कुठे कळले?
सुख कळले पण भोगणे कळले नाही. अनेकांच्या घरात दोन-चार गाड्या असतात पण ते चालवू शकत नाहीत हे दुःखद आहे. अनेकांनी पैसा भरपूर कमावला पण पैसा कमविण्याच्या नादात स्वतःच्या शरीराकडे लक्ष न देणे, प्रकृतीची हेळसांड करणे, हव्या त्या वस्तू, महागडे अन्नपदार्थ आणू शकतात पण खाऊ शकत नाहीत. कुठे आलं सुख?
पैसा कमावण्याच्या नादात अनेकांनी सुख गमावण्यात धन्यता मानली. सुखाचा कोटा पूर्ण करण्यासाठी अनेकांनी कोटा येथे प्रवेश घेतला व आत्महत्येला जवळ केले. सुखात स्पर्धा आली की, समाधान संपते.
जगताना ज्या ज्या जाणिवा आपण भोगतो त्या आपल्या व्यक्तिमत्त्वात उतरतात. चांगले खाणे, भोगणे, शानशौकित राहणे, उपभोग घेणे या अनेकांच्या सुखाच्या कल्पना आहेत.
दुसऱ्यासाठी जगताना सुखाचा परिघ जास्त विस्तारतो. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे सामर्थ्य आपल्यात यायला हवे. सुखाची अनुभूती स्वतःच्या सुखात नसून संतांनी जसे लोककल्याणातच आपल्या जीवनाची यथार्थता पणाला लावली. म्हणून त्यांच्या पायवाटेनेच आज अनेकजण मार्गक्रमण करत सुख शोधत शोधत जीवनाचा प्रवास करत आहेत. संतांनी स्वतः त्यागमय जीवन जगून सद्विचार व सदआचरणाचे धडे दिल्यामुळे अनेकजण सुखी व समाधानी आहेत. जीवनातील स्पंदने टिपता यायला हवीत. वाऱ्यामुळे हलणाऱ्या पिंपळाच्या पानांची सळसळता अनुभवता यायला हवी. प्रेमातली हृदयाची धडधड, आईचे वात्सल्य हीच सुखाची परिमाणे आहेत.
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे…
हे अनुभवता यायला हवे. इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे हा अनुभव घेता यायला हवा.
सुख कळायला दवबिंदू होता आले पाहिजे. अस्तित्व क्षणिक असले तरीही नैराश्याचा कुठेही मागमूस नाही.
दुसऱ्यांना सुखावह वाटावे असे जगलेे पाहिजे.
आज फिर जीने की तमन्ना है…
आज फिर मरने का इरादा है…
या दोन्हींचे भान ठेवून जगता यायला हवे. सुखासुखी आयुष्य जगायचे सोडून दीनदुबळ्यांसाठी स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करणाऱ्यांना सुख कळले. स्वतःसाठी जगणाऱ्यांना सुख कुठे कळते?
आपल्यावर हल्ला होणार हे माहीत असूनही लोकांना अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी व परंपरा, कर्मकांड यातून बाहेर काढणारे नरेंद्र दाभोलकर यांना खरे सुख कळले होते, स्वतःचे नव्हे तर लोकांचे. दुःख
माणसाला घडवतं. विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी सुखलोलुपता दूरच ठेवायला हवी. शिस्तीत आयुष्य घालवले, तर पुढे सुखच सुख आहे.
आजच्या विद्यार्थ्यांसमोर प्रसारमाध्यमे हात जोडून उभी आहेत. असंख्य प्रलोभनांच्या मध्ये विद्यार्थी आहेत. त्यात स्वतःला न गुंतू देता विद्यार्थी दशेला न्याय दिला तरच पुढे योग्य माणूस घडेल. तावून सुलाखूनच व्यक्तिमत्त्व आकार घेते. तावून सुलाखावून जे घडतात तेच सुखाचे हकदार होतात.
अंतर्मनाची प्रेरणाच स्वत: स्वतःला घडविते. प्रेरणेची पायवाट कधी कधी आपणही निर्माण करायची असते.