मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला उबाठांना टोला
यवतमाळ : किमान मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होऊ शकतो अशी चर्चा तरी ठेवा, असे पत्रकारांशी काहीजण बोलले. एका चेहऱ्यामागे अनेक चेहरे लोक लावतात. एका माणसाला किती चेहरे असतात, ते माझ्यापेक्षा कुणी ओळखू शकत नाही. ज्या आघाडीतल्या मित्रपक्षांनाही तुमचा चेहरा नकोसा झालाय. त्याला जनता कशी स्वीकारेल, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
यवतमाळ येथे कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे म्हणाले की, आज ज्यारितीने राजकारण करत आहेत. त्यांना उठता बसता, झोपतानाही एकनाथ शिंदे, महायुती सरकार आठवत आहे. तुमच्या पोटात का दुखत आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून. गरीब कुटुंबातील आहे म्हणून. सोन्याचा चमचा घेतलेल्यांनी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे का? आम्ही २४ तास काम करतोय. मी पहाटेपर्यंत काम करतो. अजितदादा पहाटेपासून कामाला सुरुवात करतात आणि देवेंद्र फडणवीस पूर्ण दिवसभर काम करतात असे २४ बाय ७ सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
तुमचा आशीर्वाद या भावांच्या पाठिशी कायम ठेवा
तसेच माझ्या बहिणींना विनंती आहे, हे खोटेनाटे लोक आले तर त्यांना विचारा, तुम्ही आमच्यासाठी काय केले. तुमचे सरकार होते, तेव्हा काही दिले नाही. ५०-६० वर्षात कधी काँग्रेसला सुचले? स्वत: राजीव गांधी म्हणाले होते, केंद्राने १ रुपया दिला तर सामान्य जनतेपर्यंत पोहचेपर्यंत ते १५ पैसे होतात म्हणजे ८५ टक्के भ्रष्टाचार होत होता. आम्ही १५०० रुपये महिन्याला देतोय जर दुसरे सरकार असते तर हातात ४०० रुपयेच पडले असते. आम्ही पूर्ण पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर दिले. तुमचा आशीर्वाद या भावांच्या पाठिशी कायम ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या; देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला
बदलापूरसारख्या संवेदनशील घटनेवर राजकारण करणाऱ्या विरोधकांच्या तोंडाला पट्ट्याच लागलेल्या बऱ्या, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटनांविरोधात राज्यभर मूक आंदोलन करणाऱ्या विरोधकांना टोला हाणला.
यवतमाळमध्ये शनिवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर येथील लैंगिक शोषणाच्या मुद्यावरून राज्यभर मूक आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षांना टोला हाणला.
फडणवीस म्हणाले की, बदलापूर सारख्या घटनेचे राजकारण करणे हे असंवेदनशीलतेचा कळस आहे. काही लोकांना यातही मतांचे राजकारण करतात. काही लोक तोंडाला पट्ट्या लावून बसतात. माझी त्यांना विनंती आहे की, तुमच्या तोंडाला पट्ट्या लागलेल्याच बऱ्या आहेत. कारण, ते समाजात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. महिलांचे हक्क, महिलांची सुरक्षा, त्यांच्या विकासासाठी सर्वांनी एका सूरात बोलले पाहिजे. पण विरोधकांना केवळ राजकारण करायचे आहे. त्यामुळे तुम्ही सूसंवाद साधू शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या संवेदनशील प्रकरणावर राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, सरकारने पोलिस व प्रशासनाला प्रत्येक शाळेत जाऊन मुलींची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आलेत. त्यातून त्यांच्याशी कुणी दुर्व्यवहार तर करत नाही ना याची माहिती गोळा केली जात आहे. या मोहिमेत अमरावती येथील एका शाळेतील मुलीने एक शिक्षक त्रास देत असल्याची माहिती दिली. त्यानंतर सरकारने सदर शिक्षकाला तत्काळ जेरबंद करण्याचे काम केले. कुठेही आमच्या मुलींसोबत असे काम करत असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही. पण हा कायदा सुव्यवस्थाच नव्हे तर सामाजिक प्रश्नही आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.