जिल्ह्यातील शाळांना अभियानात सहभागी होण्याचे आवाहन
अलिबाग : राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, गुणवत्ता वाढ व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे. तसेच शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा कालावधी १५ सप्टेंबरपर्यंत ठरविण्यात आला आहे.
या अभियानाच्या टप्पा दोनमध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांनी अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले आहे. या अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांचे पुढील मुद्दयांच्या आधारे गुणांकन करण्यात येईल. पायाभूत सुविधा ३३ गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी ७४ गुण, शैक्षणिक संपादणूक ४३ गुण असतील. तालुका स्तरावरील मुल्यांकनाचे कार्याचा विचार करता, प्राथमिक स्तरावरील मुल्यांकन समितीचे अध्यक्ष केंद्रप्रमुख हे आहेत. तालुका स्तरावरील मुल्यांकन समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी, पंचायत समिती हे आहेत. जिल्हास्तरावरील मुल्यांकन समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे आहेत.
तालुका स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून प्रथम क्रमांक ३ लाख, द्वितीय क्रमांक ३ लाख, तृतीय क्रमांक ३ लाख, इतर व्यवस्थापनांच्या शाळांमधून प्रथम क्रमांक तीन लाख, व्द्वितीय क्रमांक दोन लाख, तृतीय क्रमांक एक लाखाचे बक्षिस असेल. जिल्हास्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून प्रथम क्रमांक ११ लाख, द्वितीय क्रमांक ५ लाख, तृतीय क्रमांक ३ लाख, इतर व्यवस्थापनांच्या शाळांमधून प्रथम क्रमांक ११ लाख, द्वितीय क्रमांक ७ लाख, तृतीय क्रमांक ३ लाख अशाप्रकारे रायगड जिल्हयात बक्षिसे मिळणार आहेत.